पावसाळ्यात दुर्गम लिंगाणा सर करून फडकवला तिरंगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:38 IST2021-08-18T04:38:28+5:302021-08-18T04:38:28+5:30
कळंब : जागेवरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भूभागावरील निसरडी वाट असलेल्या दुर्गम अशा लिंगाण्याच्या ‘वाटेला’ किमान पावसाळ्यात ...

पावसाळ्यात दुर्गम लिंगाणा सर करून फडकवला तिरंगा
कळंब : जागेवरच तीव्र उंच असलेला सुळका, त्यात खडकाळ भूभागावरील निसरडी वाट असलेल्या दुर्गम अशा लिंगाण्याच्या ‘वाटेला’ किमान पावसाळ्यात तरी कोण जात नाही. मात्र, दुर्दम्य इच्छाशक्ती आणि प्रखर देशभक्ती असलेल्या ‘शिलेदार’ परिवाराच्या आठ गिर्यारोहकांनी हा गिरीदुर्ग तर सर केलाच, शिवाय देशाच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनी लिंगाण्यावर ७५ फूट रूंदीचा तिरंगा फडकावला आहे. यात कळंब येथील शुभम राखुंडे या ‘ट्रेकर’ नेही सहभाग नोंदवला.
रायगडचा उपदुर्ग असलेला लिंगाणा हा अतिशय दुर्गम व तीन हजार फुटांपेक्षा अधिक उंचीचा हा सुळका कठीण खडकाळ असाच. महाडपासून काही अंतरावर असलेल्या अरूंद वाटाच्या अन् विविध घाटांच्या या दुर्गम भागातील लिंगाणा हा दुर्ग सर करणे, ते ही पावसाच्या धारा कोसळत असताना महत्कठीणच. अशा या खडतर मोहिमेची आखणी शिलेदार गिर्यारोहक संस्थेने केली. स्वातंत्र्यदिनी लिंगाणा सर करायचा अन् तेथे तिरंगा फडकवायचा, असा दृढनिश्चय केला. शिलेदारचे संस्थापक सागर नलावडे, प्रवीण परब, अनिकेत जाधव, सागर मोहिते, शैलेश जाधव, मोनिष येनपुरे, कविता जाधव, शीतल जाधव, अमिता सालीयन, विनायक पुरी, प्रशांत सूर्यवंशी या विविध भागातील गिर्यारोहकांसह कळंब येथील शुभम राखुंडे हा तरूणही यात सहभागी झाला होता.
सागर नलावडे यांच्या नेतृत्वाखाली या टीमने १४ ऑगस्ट रोजी लिंगाण्यालगतच्या मोहरी गावात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी लिंगाण्याची वाट धरली. यासाठी कठीण अशा बोराट्याची नाळ या अरूंद, घसरण असलेल्या घाटातून मार्गस्थ होत, एकमेकांचा आधार बनत सुळका सर करण्याचा प्रयत्न केला. यानंतर दुर्गम लिंगाणा सर करत त्याठिकाणी ७५ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत ७५ फूट रूंदीचा तिरंगा दिमाखात फडकवला.
चौकट...
पावसाळ्यात धाडस, मोहीमही फत्ते
उंचच्या उंच सुळका, त्याची खडकाळ अन् निसरडी वाट, नाळेत खळाळणारे पाणी, जागोजागची घसरण, धुक्याचे सावट अन् बरसणाऱ्या धारा यामुळे पावसाळ्यात लिंगाणा सर करणे कठीणच असते, असे सांगत शुभम राखुंडे यांनी आम्ही सर्वांनी एकमेकांना आधार देत, काळजी घेत ही मोहीम पावसाळ्यातच फत्ते केली असे सांगितले. यास पायथ्यावरून रजनीकांत जाधव यांनी योग्य बॅकअप दिले.