वाशी (जि. धाराशिव) : तालुक्यातील तांदुळवाडी येथील एका शेतकऱ्यास पोलिसांनी मारहाण केल्याची घटना शनिवारी घडली आहे. या शेतकऱ्याने पवनचक्कीच्या जागेचा योग्य मोबदला मिळण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू केले असता त्यांना त्यांच्याच शेतातील उसाने मारहाण केल्याचा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे.
तांदुळवाडी येथील शेतकरी गणेश शेरकर यांच्या शेतात पवनचक्की उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, त्यांच्याच शेजारी झालेल्या दुसऱ्या कंपनीने शेजारी शेतकऱ्यास चांगला मोबदला दिला. तसाच मोबदला मिळण्याची मागणी शेरकर यांनी केली. मात्र, कंपनीने बळाचा प्रयोग केल्याचा आरोप नागरिकांचा आहे. शेरकर यांच्यासोबतच काही स्थानिक सत्ताधारी राजकीय पुढाऱ्यांनाही पोलिस उपअधीक्षक स्वप्नील राठोड यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांसह मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. यावरून पोलिस सामान्यांच्या रक्षणासाठी की कंपन्यांच्या हितासाठी, असा सवाल शेतकऱ्यांतून विचारला जात आहे.