रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे, दीड टक्के रुग्णांनाच मोफत उपचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST2021-05-19T04:33:58+5:302021-05-19T04:33:58+5:30
उस्मानाबाद : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून जवळपास दीड महिन्यात केवळ ३५७ रुग्णांवरच मोफत उपचार झाले आहेत. दुसरीकडे याच ...

रुग्णालयांना जनआरोग्यचे वावडे, दीड टक्के रुग्णांनाच मोफत उपचार
उस्मानाबाद : महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून जवळपास दीड महिन्यात केवळ ३५७ रुग्णांवरच मोफत उपचार झाले आहेत. दुसरीकडे याच कालावधीत तब्बल २६ हजारांवर नवीन रुग्ण आढळून आले. रुग्णांच्या तुलनेत दीड टक्क्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकलेला नाही.
ज्या कुटूंबाकडे रेशन व आधारकार्ड आहे, अशा सर्वांनाच महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत कोविड उपचार मिळण्याची सोय आहे. असे असले तरी त्याचा लाभ मात्र पुरेसा मिळू शकलेला नाही. जिल्ह्यात १ एप्रिल ते १२ मे या कालावधीत कोरोना रुग्णांची वेगाने वाढ झाली. तब्बल २६ हजारांवर रुग्ण या कालावधीत आढळून आले. मात्र, योजनेतून उपचार मिळाले केवळ ३५७ रुग्णांना. त्यातही शासकीय रुग्णालयेच या योजनेतून उपचार देण्यात आघाडीवर आहेत. जिल्ह्यात सध्या १३ रुग्णालयांत ही योजना अंगीकृत आहे. यातील सहा रुग्णालये खाजगी आहेत. उपराेक्त कालावधीत या खाजगी रुग्णालयांनी केवळ ८२ रुग्णांना या योजनेचा लाभ दिला आहे. तर उर्वरित ७ शासकीय रुग्णालयांनी २७५ रुग्णांना लाभ दिला आहे. या योजनेतून मंजूर होणारी रक्कम पुरेशी नसल्याने खाजगी रुग्णालयांतून ही योजना राबविण्याबाबत अनुत्सुकता दिसत आहे.
पॅकेज ठरतेय तुटपुंजे...
या योजनेअंतर्गत एका कुटूंबाला दीड लाखांपर्यंतची मदत शासन देते. रुग्णाची प्रकृती लक्षात घेऊन त्यानुसार याेजनेचे पॅकेज ठरत असते. अगदी २० हजारांपासून याची सुरुवात होते. मात्र, गंभीर असलेल्या रुग्णाचे बिल हे दीड लाखांच्या वर जाण्याचीही शक्यता असते. ही वरची रक्कम रुग्ण किंवा नातेवाईक देणार नाहीत, या शंकेने खाजगी रुग्णालये शक्यतो असे रुग्ण टाळण्याच्या बेतात असतात.
अशी करा नोंदणी...
या योजनेशी संलग्न असलेल्या प्रत्येक रुग्णालयात आरोग्य मित्राची नेमणूक केलेली असते. रुग्णालयात गेल्यानंतर लागलीच आरोग्य मित्राकडे रेशन व आधार कार्ड जमा केल्यास तो नोंदणी करुन घेतो. दरम्यान, रुग्णालयात जाताना सोबत कागदपत्रे नसली तरी उपचार सुरु करुन नंतरही कागदपत्रे आरोग्यमित्राकडे जमा करता येऊ शकतात.
तर करा तक्रार...
याेजनेत अंगीकृत असलेल्या रुग्णालयाने या योजनेतून उपचार करण्यास असमर्थतता दर्शविल्यास रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांना याबाबत तक्रार करता येते. संबंधित रुग्णालयातील आरोग्यमित्राकडे ही तक्रार देता येईल. तेथे शक्य नाही झाल्यास योजनेचे जिल्हा समन्वयक किंबहुणा जिल्हा शल्यचिकित्सकांकडेही तक्रार देता येऊ शकते.
पैसे भरण्याची तयारी असल्यासच ॲडमिशन...
१. या योजनेतून उपचार सुरु करण्यापूर्वी किंवा ॲडमिशन करुन घेण्यापूर्वीच रुग्णालयांकडून बिलाबाबत सांगण्यात येत आहे. रुग्ण गंभीर असल्यास उपचारावर जर जास्तीचा खर्च झाला तर वरची रक्कम द्यावी लागेल. ती देण्याची तयारी असल्यासच ॲडमिट करुन घेण्यात येत असल्याचे एका रुग्णाच्या नातेवाईकाने सांगितले.
२. रुग्णसंख्या एकाएकी वाढल्याने खाजगी रुग्णालयांत बेड मिळणे कठीण झाले होते. त्यातही योजनेत समाविष्ट असलेल्या रुग्णालयांत तर तोबा गर्दी. त्यातही योजनेतून उपचार घ्यायचे असे सांगितल्या बेड फुल्ल असल्याचा निरोप कानी पडत असल्याने शासकीय रुग्णालय गाठावे लागल्याचे एका नातेवाईकाने सांगितले.
३. रुग्णालय प्रशासन व नातेवाईकांमध्ये योजना व बिलावरुन निर्माण होत असलेल्या वादामुळे काही खाजगी रुग्णालयांनी या योजनेतून आता अंग काढून घेतले आहे. त्यामुळे याेजनेतील खाजगी रुग्णालयांची संख्या कमी झाली आहे.
अशी आहे आकडेवारी...
योजनेशी जोडलेली जिल्ह्यातील रुग्णालये : १३
एकूण कोरोनाबाधित : २६०००
कोरोनामुक्त : २०९६७
मृत्यू : ४७४
योजनेचे लाभार्थी : ३५७