पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:37 IST2021-08-24T04:37:01+5:302021-08-24T04:37:01+5:30
उमरगा : पालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसेतसे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. विकासकामांचे श्रेय घेण्याची चढाओढ ...

पालिका निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना आला वेग
उमरगा : पालिका निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसेतसे शहरातील राजकीय वातावरण चांगलेच तापत आहे. विकासकामांचे श्रेय घेण्याची चढाओढ सत्ताधारी व विरोधकात सुरू असून, शनिवारी शहरात पालिकेंतर्गत केले गेलेल्या साडेआठ कोटींच्या विकासकामांचे लोकार्पण पालिकेतील विरोधक असलेल्या शिवसेनेने पालकमंत्र्यांच्या हस्ते करून वातावरण निर्मिती केली आहे. दुसरीकडे उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवाराकडून फिल्डिंग लावणे चालू असून, संभावित वाॅर्डात सक्रियतादेखील वाढली आहे. पालिकेतील विरोधक व सत्ताधाऱ्यांमध्ये भ्रष्टाचार, पालिकेतील आर्थिक गैरव्यवहार यावरून आरोप प्रत्यारोपाची मालिका सुरू आहे.
उमरगा पालिकेत शिवसेना व काँग्रेस हे कट्टर प्रतिस्पर्धी असून, शहरात यांचा मोठा प्रभाव आहे. असे असले तरी भाजप व राष्ट्रवादी यांचाही प्रभाव दखलपात्र असून, सत्तेच्या चाव्या कायम यांच्याच हातात असतात. मागील वेळी शिवसेना, काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी यांनी स्वबळावर निवडणूक लढविल्या होत्या. त्यात काँग्रेसला नगराध्यक्ष पदावर विजय व आठ जागेवर यश मिळाले होते तर भाजपने सात, शिवसेनेला चार तर राष्ट्रवादीने फक्त तीन जागी विजय मिळविला होता. सर्वात मोठा पक्ष समजल्या जाणाऱ्या काँग्रेससोबत भाजपने सूत जमवित सत्तेत जागा मिळविल्यानंतर शिवसेना व राष्ट्रवादी दोघेही विरोधात राहिले. परंतु, चालू पंचवार्षिकमध्ये पालिकेच्या इतिहासात सर्वात जास्त विकासकामे होऊनही पालिकेतील आर्थिक गैरव्यवहार, निकृष्ट दर्जाची कामे, भ्रष्टाचार याच मुद्याचा सर्वात जास्त गाजावाजा होत राहिला. परिणामी विकासकामे होऊनही जनतेमध्ये नाराजी कायम आहे.
प्रत्येक पक्षाकडून सध्या वाॅर्डनिहाय चाचणी, कार्यकर्त्यांची सक्रियता वाढविली जात असून, इतर पक्षाचे व नवीन कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश, मेळावे, शाखा काढण्याला प्राधान्य दिले जात आहे. एकीकडे विरोधक असलेल्या शिवसेनेकडून पालिकेतील सत्ताधारी काँग्रेसने निष्क्रिय कारभार केल्याचा आरोप केला जात असतानाच शहरात पालिकेकडून केले गेलेल्या विकासकामांचे श्रेय स्वतःकडे घेत जवळपास साडेआठ कोटीच्या विकासकामांचे लोकार्पण पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या हस्ते केले आहे. तर झालेल्या विकासकामांचे श्रेय घेण्यात काँग्रेस मात्र कमी पडत असल्याचे चित्र आहे.