टाळ-मृदंगाच्या गजरात पोलीस ठाणे, पालिकेवर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:30 IST2021-04-14T04:30:19+5:302021-04-14T04:30:19+5:30
(फोटो : जावेद इनामदार १३) मुरुम : शहरात मानवी जीवनाला घातक ठरणाऱ्या गावठी दारूची खुलेआम विक्री होत असून, मटकाही ...

टाळ-मृदंगाच्या गजरात पोलीस ठाणे, पालिकेवर मोर्चा
(फोटो : जावेद इनामदार १३)
मुरुम : शहरात मानवी जीवनाला घातक ठरणाऱ्या गावठी दारूची खुलेआम विक्री होत असून, मटकाही सुरू आहे. हे अवैध धंदे तात्काळ बंद करावेत, या मागणीसाठी शहरातील महिला व एआयएसएफच्या युवकांनी पोलीस ठाणे आणि नगर परिषदेवर टाळ-मृदंगाच्या गजरात मोर्चा काढून निषेध व्यक्त केला.
यावेळी प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यात म्हटले आहे की, शहरामध्ये सुमारे दहा ते पंधरा अवैध रसायनयुक्त विषारी हातभट्टी दारू व ताडीची दुकाने आहेत. ही दुकाने अवैधरीत्या कोणत्याही परवानगीशिवाय शासनाच्या जागेवर खुलेआम चालविली जात आहेत. या विषारी दारूच्या नशेत महिलांचा छळ होत असून, अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत. यामुळे ही दारू विक्री बंद करावी, अन्यथा यानंतर विषारी दारूमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर पोलीस ठाण्यासमोर अंत्यविधी करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे.
नगरपालिकेच्या जागेवर अवैध दारू दुकाने सुरू असल्याने त्यांच्यावर नगरपालिकेच्या माध्यमातूनही कारवाई होण्यासाठी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनादेखील यावेळी निवेदन देण्यात आले.
यावेळी एआयएसएफचे लखन बोंडवे व राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त करताना पोलीस प्रशासनावर रोष व्यक्त केला.