सीना-कोळेगाव प्रकल्पात माशांवर विषप्रयोग?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST2021-05-18T04:33:50+5:302021-05-18T04:33:50+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पात माशांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा डोमगाव ग्रामपंचायतीने सोमवारी केला आहे. ...

सीना-कोळेगाव प्रकल्पात माशांवर विषप्रयोग?
उस्मानाबाद : जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या सीना कोळेगाव प्रकल्पात माशांवर विषप्रयोग करण्यात आल्याचा दावा डोमगाव ग्रामपंचायतीने सोमवारी केला आहे. यामुळे हजारो मासे मृत्युमुखी पडले असून, विषयुक्त पाण्यामुळे अन्य वन्य जीवांना, तसेच या प्रकल्पावर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनाही धोका निर्माण झाला आहे. या संदर्भात ठेकेदाराविरुद्ध पोलिसांकडे तक्रारही करण्यात आली.
सीना-कोळेगाव प्रकल्पातील मासेमारीचा ठेका भोत्रा येथील एका संस्थेने घेतलेला आहे. तो जूनअखेर पूर्ण होत आहे. कोळंबीसारखा महागडा मासा तयार होण्यासाठी या संस्थेकडून धरणाच्या पाणीसाठ्यात बीज सोडण्यात आले होते, परंतु सध्या लॉकडाऊनमुळे मोठ्या शहरातील मार्केट बंद असल्याने, हा मासा व इतर जातींच्या माशांची विक्री बंद झाली आहे. या आर्थिक नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी संबंधित संस्था चालकाने शासकीय योजनेचा लाभ किंवा विमा मिळविण्यासाठी जलाशयात विष टाकून मासे मारल्याचा संशय डोमगाव ग्रामपंचायतीने व्यक्त केला आहे. दूषित पाण्यामुळे डोमगाव ग्रामस्थ व परिसरातील लोकांना धोका निर्माण झाला आहे. या अनुषंगाने ग्रामपंचायतीने परंडा पोलिसांकडे तक्रार दिली असून, जिल्हाधिकाऱ्यांनाही तक्रार देण्यात आली आहे.
गुन्हा दाखल करण्याची मागणी...
डोमगाव ग्रामपंचायत सोबतच येथील बापुराव काळे, जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक हरिश्चंद्र मिस्कीन, ज्योतीराम मिस्कीन, बाबासाहेब गायकवाड, विलास काळे, प्रशांत खैरे यांनी परंडा पोलीस ठाण्यात डोमगाव पाणीपुरवठा व परंडा पाणीपुरवठा योजनेला धोका निर्माण झाल्याने मत्स्य व्यवसाय संस्थेच्या चेअरमनवर तत्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारीद्वारे केली आहे.
पाण्याचा रंग बदलला...
सरकारी योजनेचा लाभ अथवा विमा मिळविण्याच्या उद्देशाने धरणातील जलसाठ्यात विषारी औषध सोडण्यात आले आहे. या औषधामुळे जलाशयातील पाण्याचा रंग पूर्णपणे बदलला असून, पूर्ण पाणी हिरवेगार झाले आहे. जलाशयातील पाणी दूषित झाल्याने कोळंबी मासे मृत्युमुखी पावले आहेत. या धरण जलाशय आधारावर परंडा तालुका व करमाळा तालुक्यातील शेकडो पाणीपुरवठा योजना कार्यान्वित आहेत. धरणातील पाणी दूषित झाल्याने मोठे संकट निर्माण झाले असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने केला तपास सुरू...
ग्रामपंचायतीने पोलिसांना तक्रार देताच, या पाण्यामुळे भविष्यात इतर व्यक्ती व प्राणी यांच्या जीवितास धोका होऊ नये, यासाठी डोमगाव ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन पाणीपुरवठा योजना असलेल्या नगरपरिषद, ग्रामपंचायतीसह तहसील व जलसंपदा विभागास ही बाब अवगत करून देऊन उपाययोजना करण्यास सांगावे. पोलीस आपल्या स्तरावर तपास करीत असल्याचे पत्र परंडा पोलीस प्रशासनाने ग्रामपंचायतीस दिले आहे.