ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी जिल्हा नियोजनातून एक कोटी मंजूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:33 IST2021-04-20T04:33:55+5:302021-04-20T04:33:55+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा त्या प्रमाणात ...

ऑक्सिजन कॉन्सट्रेटरसाठी जिल्हा नियोजनातून एक कोटी मंजूर
उस्मानाबाद : जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्याने ऑक्सिजन बेड उपलब्ध करण्यात आलेले आहेत. मात्र, ऑक्सिजनचा पुरवठा त्या प्रमाणात होत नाही. दररोज १२ मेट्रिक टन ऑक्सिजनची जिल्ह्यास गरज आहे. सध्या दहा मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे. त्याकरिता हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या ऑक्सिजन कॉन्सट्रेटर मशिनरी खरेदीसाठी जिल्हा नियोजनमधून एक कोटी रुपये मंजूर करण्यात आहे असून, खरेदी प्रक्रिया लवकर करण्यात येणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिली.
जिल्ह्यात कोरोनाच्या सद्य:स्थितीबाबतचा आढावा पालकमंत्री शंकरराव गडाख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी पालकमंत्री गडाख म्हणाले, ऑक्सिजनचा कोटा उपलब्ध राहावा, याकरिता
चाकण येथील लिक्विड टँकमधून लिक्विड तामलवाडी व उस्मानाबाद येथील प्लांटमध्ये उपलब्ध करण्यासाठी उपजिल्हाधिकारी नेमण्यात येणार असून, या ठिकाणाहून टँकर पोलीस संरक्षणार्थ आणण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय, ऑक्सिजन कॉन्सट्रेटर खरेदीसाठी मी स्वत: ११ लाख रुपयांचा निधी दिला आहे, तर एक कोटी रुपये जिल्हा नियोजनमधून मंजूर करण्यात आले आहेत. कॉन्सट्रेटर खरेदीची प्रक्रिया लवकर राबविण्यात येणार असल्याचे पालकमंत्री गडाख म्हणाले. मार्च महिन्यात रुग्ण वाढू लागल्याने दहा हजार रेमडेसिविर इंजेक्शनची ऑर्डर दिली होती. देशात तुडवडा असल्याने आतापर्यंत केवळ दीड ते दोन हजार व्हायल मिळाले आहेत. इंजेक्शनच्या पुरवठ्यासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून पाठपुरवठा केला जात आहे. डॉक्टरांनी रुग्णांचे ऑक्सिजन ८० पर्यंत व एचआरसीटी स्कोअर १० ते १२ असेल तरच रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचे ठरवावे, शिवाय, त्याचे रेकॉर्ड ठेवावे याबाबत डाॅक्टरांना सूचना दिल्याचे गडाख यांनी सांगितले. यावेळी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर, आमदार कैलास पाटील, आमदार ज्ञानराज चौगुले, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अप्पर जिल्हाधिकारी रूपाली आवले, अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हनुमंत वडगावे उपस्थिती होते.
‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ अभियान
कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी ‘माझं गाव, माझं जबाबदारी’चे पहिले दोन टप्पे सुरळितपणे पार पडले. आता माझं गाव कोरोनामुक्त गाव अभियान राबविण्यात येणार असून, ग्रामपंचायत स्तरावर ग्राम कोरोना पर्यवेक्षकांची निवड करण्यात येणार आहे. पर्यवेक्षकावर ५० कुटुंबाची जबाबदारी असणार आहे. यातून प्राथमिक लक्षणे आढळून आलेल्या रुग्णांच्या टेस्ट करणे सोपे होणार आहे.
महामारीत राजकारण करणे बरोबर नाही
कोरोनाच्या महामारीत सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाविरुद्ध लढणे गरजेचे आहे. अशा स्थितीत विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. मात्र, सध्या राजकारण न करता जनतेला सहकार्य करायचे आहे. आरोप झाले तरी काम करीत राहायचे आहे. सध्या राजकारण करणे बरोबर नसून महामारीतून बाहेर पडल्यानंतर राजकारण केले जाईल, असेही पालकमंत्री गडाख म्हणाले.