रस्ते नव्हे, मृत्युचे सापळे !
By Admin | Updated: August 4, 2014 00:50 IST2014-08-04T00:40:20+5:302014-08-04T00:50:35+5:30
विजय मुंडे, उस्मानाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ साडेचार वर्षात तब्बल ३२४५ अपघात झाले
रस्ते नव्हे, मृत्युचे सापळे !
विजय मुंडे, उस्मानाबाद
जिल्ह्यातील राष्ट्रीय, राज्य मार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांवर अपघाताचे प्रमाण वाढले आहे़ साडेचार वर्षात तब्बल ३२४५ अपघात झाले असून, यात १४६८ जणांना प्राणास मुकावे लागले आहे़ तर ४८१७ लोक जखमी झाले आहेत़ यातील अनेकांना हात-पाय गमवावे लागले आहेत़ प्रशासनाची उदासिन भूमिका, कायद्याचा नसलेला धाक आणि ‘अर्थकारणा’ने चालणारा प्रवास अशी अनेक कारणे याला जाबाबदार दिसून येतात़
जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरच नव्हे तर ग्रामीण भागातील भीषण अपघातांनी अनेकांचे ह्दय हेलावून सोडले आहे़ नळदुर्ग नजीक पुलावरून कोसळलेली लग्झरी, तुळजापूर नजीक विद्यार्थ्यांच्या बसला झालेला अपघात, चोराखळी नजीक गावाकडे परतणाऱ्या भाविकांवर काळाने घातलेला घाला, अशी एक नव्हे अनेक उदाहरणे समोर आहेत़ मोठा अपघात झाल्यानंतर काही काळ पोलिस, उपप्रादेशिक परिवहन, एस़टी़महामंडळासह इतर प्रशासनाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येतो़
एऱ्हवी मात्र, ‘हम-साथ-साथ’ म्हणत केल्या जाणाऱ्या ‘अर्थकारणा’मुळे राजरोसपणे अवैध प्रवाशी वाहतुकीसह वाहतुकीचे नियम ढाब्यावर बसविण्याचा प्रकार सुरू आहे़ त्यामुळेच अपघाताच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे़ साडेचार वर्षातील आकडेवारी पाहता २०१३ मध्ये अपघाताची संख्या कमी असली तरी ३२५ जण ठार झाले असून, ९०१ लोक जखमी झाले आहेत़ चालू वर्षी जून अखेरपर्यंत ३४२ अपघात झाले असून, यात १६३ जणांना प्राण गमवावे लागले आहेत़ तर ६३१ जण जखमी झाले आहेत़ अवैैध प्रवाशी वाहतुकही बऱ्याचअंशी अपघाताला कारणीभूत ठरत आहे.
कारवाईचा बडगा हवा
रस्ता सुरक्षा मोहीम किंवा एखादे टार्गेट आल्यानंतर मोठ्या प्रमाणात कारवाईचा बडगा उगारण्यात येतो़ त्यात किरकोळ चुका धरूनही दंडाची पावती हाती सोपविण्यात येते़ मात्र, वर्षातील ३६५ दिवस सातत्याने ‘राजकारण विरहित’ कारवाईसत्र राबविले तर अपघाताला लागम लागण्यासह वाहतुकीचे नियम पाळणाची सवयही अनेकांना लागेल.
खड्डेही ठरताहेत कारण
राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग असो अथवा ग्रामीण भागातील रस्ता असो खड्डा नाही असा एकही रस्ता जिल्ह्यात सापडणार नाही़ नव्हे, हे उस्मानाबाद जिल्ह्याचे वैशिष्ठ्यच म्हणावे लागेल! त्यात खचलेल्या साईडपट्ट्यांनी त्यावर कळस चढविला आहे़ खड्ड्यांमुळे अपघात वाढत आहेत.
कुटुंबावर आघात
अपघातात कुणाचा बाप, कुणाची आई तर पती, पत्नी, बहिण, मुलगा, मुलगी अशा अनेकांना आपला जीव गमवावा लागतो़ यातील अनेकजण घराचा आधारवड असतात़ घराचा आधारवडच निघून गेला तर कुटुंबावर काय संकट कोसळते ते त्या कुटुंबालाच माहिती़ त्यामुळे वाहने चालविताना स्वत:सह प्रवाशांच्या जीवाची काळजी घेण्याचे अद्य कर्तव्य चालकांनी बाळगण्याची गरज आहे़
सा डे चा र व र्षा ती ल अ प घा त
वर्ष अपघात ठारजखमी
२०१० ७२७ २९०११४२
२०११ ७५४ २९१११७१
२०१२ ७९७ ३९९९७२
२०१३ ६५२ ३२५९०१
जून २०१४ ३४२ १६३६३१
एकूण ३२४५ १४६८४८१७
एखादा अपघात झाला की बघ्यांची गर्दी होते़ मात्र, पोलिस येईपर्यंत जखमींना मदत करण्यासाठी कुणाचेच हात पुढे येत नाही़ बहुतांश वेळा असे होते़ नागरिकांनी मनातील चौकशीचा ससेमिरा बाजूला करून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्याची गरज आहे़ आपल्या काही तासाच्या वेळेमुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात़ हे जमत नसेल तर १०० क्रमांकावर किंवा जवळील पोलिस ठाण्याशी संपर्क करून त्वरित माहिती द्या़
वेग मर्यादेचे उल्लंघन
दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर न ठेवणे.
योग्य अंदाज न बांधणे.
चुकीच्या पध्दतीने ओव्हरटेक करणे.
वाहन मागे घेताना दक्षता न बाळगणे.
योग्य तो इशारा न देणे.
मद्यप्राषण करून वाहन चालविणे.
सर्वसामान्यांच्या चुकांमुळे (रस्त्यावर येणे, वाहन न पाहणे, चालत्या गाडीतून उतरणे आदी़)
अशी घ्या दक्षता
वाहतुकीचे नियम पाळा.
मद्यप्राषण करून नका.
अवैैध प्रवाशी वाहतूक टाळा.
वळणावर दक्षता घ्या.
दिशादर्शक, सूचना फलकाकडे लक्ष द्या.
शिकावू चालकांच्या हाती रस्त्यावर वाहन देवू नका.
वाहनांची वेळोवेळी सर्व्हिसिंग करा.
किरकोळ बिघाडही दुरूस्त करून घ्या.