राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:01 IST2021-03-04T05:01:23+5:302021-03-04T05:01:23+5:30
मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान ...

राष्ट्रीय महामार्गाची झाली चाळण
मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरुम फाटा ते अक्कलकोट या नव्याने घोषित झालेल्या राष्ट्रीय महामार्गवर प्रामुख्याने मुरुम ते आलूर दरम्यान अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले असून खड्डयांमुळे वाहनचालक व प्रवाशांचे अंग मोकळे होत आहे. शिवाय जीव मुठीत धरुन प्रवास करावा लागत आहे.
मुरुम फाटा ते अक्कलकोट हा केंद्र सरकारकडून राष्ट्रीय महामार्ग म्हणून आठ महिन्यापूर्वी जाहीर झाला आहे. यापूर्वी हा रस्ता राज्यमार्ग होता. या रस्त्यावर गेल्या वर्षभरापासून अनेक ठिकाणी धोकादायक खड्डे पडले आहेत. यासंदर्भात ‘लोकमत’ने मध्यंतरी वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर या रस्त्यावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम अर्धवटच राहिले आहे. या रस्त्यावरुन उमरगा, अक्कलकोट, आळंद, लातूर, भोकर, पुणे, पाथरी आदी आगाराच्या दिवसभरात पन्नासेक बसफेऱ्या ये-जा करतात. पुढे हा रस्ता अक्कलकोट व उमरगा या गावांना जातो. दोन्ही गावे तालुक्याचे ठिकाण असल्याने वाहनांची नेहमी वर्दळ असते. तसेच कर्नाटकातील आळंद तालुक्यालाही हा रस्ता जात असल्याने या रस्त्यावर वाहनांची गर्दी असते. अतिवृष्टी आणि वाहनांच्या वर्दळीमुळे या रस्त्याची सध्या चाळण झाली आहे. रस्त्यावरील खड्यामुळे वाहनांची आदळआपट मोठ्या प्रमाणात होत आहे. मुरुम ते बेळंब पर्यंतच्या रस्त्यावर मोठ्याप्रमाणात धोकादायक खड्डे पडले असून, हा रस्ताच खड्डयांनी व्यापला आहे. मुरुम ते बेळंबचे अंतर केवळ पाच किलोमीटरचे आहे. रस्ता चांगला झाल्यास केवळ पाच मिनीटात मुरुमला प्रवाशांना जाता येईल. मात्र, खड्डयांमुळे प्रवाशांना पाच किलोमीटरचे अंतर कापण्यासाठी अर्धा तासाचा वेळ लागत आहे. रस्त्याचे काम होईल तेंव्हा होईल, पण महामार्ग विभागाने किमान खड्डे बुजवून वाहन चालक आणि प्रवाशांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी या भागातील नागरीकांतून होत आहे.
चौकट.......
...तर उद्योगधंद्यांना मिळेल चालना
मुरुम फाटा ते अक्कलकोट हा रस्ता कर्नाटकातील विजापूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग विभागाला जोडला जाणार आहे. या मार्गावरील वागदरी ते अक्कलकोट दरम्यान रस्त्याचे काम झाले असून, उस्मानाबाद जिल्ह्यातील मुरुम फाटा ते बोळेगावच्या सीमेपर्यंत रस्त्याचे काम होणे आवश्यक आहे. हा रस्ता झाल्यानंतर अक्कलकोट येथील स्वामी समर्थ आणि गाणगापूर येथील दत्त मंदिर, कर्नाटकातील विजापूर येथील गोलघुमट, अलमट्टी डॅम, तसेच मराठवाड्यातील लातूर व उस्मानाबाद जिल्ह्याला जोडला जाणार आहे. शिवाय कर्नाटकातील बीदर, कलबुर्गी आणि आंध्रप्रदेशातील जहिराबाद, संग्गारेड्डी, महीबूब नगर आदी जिल्ह्यांना जोडण्यासाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरणार आहे. महामार्ग विभाकडून रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दळणवळण आणि औद्योगीकरण वाढणार असून, नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळणार आहे.
कोट........
मुरुम फाटा ते अक्कलकोट या मार्गावरील बहुतांश खड्डे बुजवण्यात आले आहेत. केवळ मुरुम ते बेळंब या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम डांबरच्या टंचाईमुळे अर्धवट झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून या रस्त्त्याच्या दुरुस्तीसाठी निविदा काढण्यात आली असून, लवकरच प्रत्यक्ष रस्त्याच्या कामाला सुरुवात होणार आहे. जवळपास ७० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली असून, यात रस्त्याचे रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम होणार आहे. मुरुमफाटा ते मुरुमपर्यंत १० मीटरने रस्ता वाढणार आहे. तसेच मुरुम ते बोळेगाव या उस्मानाबाद जिल्ह्याच्या सीमेपर्यंत ७ मीटरनी रस्ता वाढणार आहे.
- विजय स्वामी, कनिष्ठ अभियंता, महामार्ग विभाग, सोलापूर