गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 05:00 IST2021-03-04T05:00:50+5:302021-03-04T05:00:50+5:30

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी ...

Missing records break the inquiry | गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

गायब अभिलेख्यांमुळे चौकशीला ब्रेक

कळंब : शेततळ्यातील बोगसगिरी उघड झाल्यानंतर कळंब तालुका कृषी कार्यालयाचा कारभार पुन्हा चर्चेत आला आहे. उपविभागीय कृषी अधिकारी यांनी नेमलेल्या समितीला शेततळ्याची अभिलेखेच मिळत नसल्याने ही अभिलेखे नेमकी गेली कुठे? असा प्रश्न आता उपस्थित केला जातो आहे.

कळंब तालुका कृषी कार्यालयामार्फत २०१५ ते २०१८ मध्ये झालेल्या शेततळ्याच्या कामांच्या चौकशीची मागणी तालुक्यातील एकुरका येथील सामाजिक कार्यकर्ते संदीपान कांबळे यांनी प्रशासनाकडे केली होती. या प्रकरणाबाबत ‘लोकमत’ नेही वारंवार पाठपुरावा केला. याची दखल घेऊन उपविभागीय कृषी अधिकारी यांनी एस. बी. गोसावी यांना पथक प्रमुख नेमून त्यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी पर्यवेक्षक आर. डी. कोंढारे, कृषी सहाय्यक ए. एन. तपसे, रोपमळा सहाय्यक व्ही. एन. शिंदे यांचे पथक चौकशीसाठी नेमले होते.

या कामाच्या चौकशीसाठी नेमलेल्या समितीने दि २१ मे २०१९ रोजी तालुका कृषी कार्यालयाला भेट देऊन तक्रारीच्या अनुषंगाने अभिलेखे उपलब्ध करून देण्याची मागणी केली. परंतु, ती देण्यात आली नाहीत. त्यामुळे तालुका कृषी कार्यालयाने नेमकी कुठे कामे केली, याची माहितीच चौकशी समितीला मिळू शकली नाही.

तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी गट नंबरसहीत तक्रार देऊन शेततळे झालेच नाहीत, असे निवेदन दिल्याने त्या आधारावर समितीने चौकशी केली व दोन शेततळ्याबाबत अहवाल दिला. परंतू, इतर शेततळ्याबाबतची कागदपत्रे तालुका कृषी कार्यालयाने उपलब्ध करून दिली नाहीत. याबाबतचा स्पष्ट उल्लेख समितीने अहवालात केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचे गांभिर्य ओळखून सर्व शेततळ्यांची अभिलेखे उपलब्ध करून देण्याच्या सूचना तालुका कृषी अधिकाऱ्यांना आपल्या स्तरावर द्याव्यात, असे उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांनी जिल्हा कृषी अधीक्षकांना अहवाल सादर करताना म्हटले आहे. पावसाच्या पाण्याची साठवणूक व्हावी, त्याद्वारे शेत शिवारात सिंचनाची सोय व्हावी व बारमाही पीके घेता यावीत अशा उदात्त हेतूने शासनाने शेततळ्यांना दिलेला निधी कामे न करताच उचलला गेल्याने शेतकरी वर्गातही संताप व्यक्त केला जात आहे. या सर्व कामाची चौकशी करण्याची मागणीही पुढे येत आहे.

चौकट -

घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता!

शासनाने शेततळ्यांसाठी विविध योजना जाहीर केल्या होत्या. त्यांच्या आकारानुसार त्याची रक्कम ठरवण्यात आली होती. कृषी मधील काहींनी भागीदारीमध्ये जेसीबी, पोकलेन यासारखी यंत्रे घेऊन ही कामे केल्याची चर्चाही त्यावेळी होती. त्यांच्या ऑफ रेकॉर्ड गुत्तेदारीचे अनेक किस्सेही त्यावेळी सांगितले जात असत. तालुक्यात काही ठिकाणी शेततळी केली, बिले उचलली व पुन्हा बुजवून त्यावर पिकेही घेतल्याची उदाहरणे सांगितली जात आहेत. त्यामुळे हा घोटाळा मोठा व व्यापक असण्याची शक्यता आहे.

Web Title: Missing records break the inquiry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.