तिसऱ्या दिवशीही बत्ती गुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:33 IST2021-04-16T04:33:18+5:302021-04-16T04:33:18+5:30
मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात मागील तीन दिवसांपासून थ्रीफेजचा वीजपुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली ...

तिसऱ्या दिवशीही बत्ती गुल
मुरुम : उमरगा तालुक्यातील केसरजवळगा गावात मागील तीन दिवसांपासून थ्रीफेजचा वीजपुरवठा बंद असल्याने गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
केसरजवळगा गावाला आलूर येथील ३३ केव्हीच्या वीज उपकेंद्रातून वीजपुरवठा केला जातो. उन्हाळा आला की उपकेंद्रावर भार दुपटीने वाढतो. त्यामुळे थ्रीफेजचा वीजपुरवठा अखंडितपणे होणे महावितरणच्या कर्मचाऱ्यांना अशक्यच होते. सध्या या उपकेंद्रातून आलूर, अचलेर, वरनाळ, केसरजवळगा, बोळेगाव या गावांना वीजपुरवठा केला जातो. या उपकेंद्रातून आलूर, केसरजवळगा, अचलेर असे तीन फीडर आहेत. या तिन्ही फिडरवर क्षमतेपेक्षा जास्त भार असल्याने एकाच वेळी तिन्ही गावात वीजपुरवठा देणे महावितरणला आतापर्यंत तरी शक्य झाले नाही. पावसाळा, हिवाळा, उन्हाळा या तिन्ही ऋतुमध्ये ही समस्या कायम आहे. त्यामुळे महावितरणकडून सध्या चक्राकार पध्दतीने प्रत्येक गावाला वीजपुरवठा केला जात आहे. प्रत्येक गावाला आठ तास थ्रीफेजचा वीजपुरवठा केला जातो. मात्र, तोही अनियमित असतो. कधी बिघाडांच्या दुरुस्तीसाठी तर कधी भार वाढल्याच्या कारणावरून वारंवार वीजपुरवठा अधुनमधून खंडित होत असतो. आठ पैकी किमान तीन ते चार तासच थ्रीफेजचा वीजपुरवठा शेतीपंपाना मिळतो. यात देखिल कधी पावसामुळे बिघाड झाल्याने तर कधी दुरुस्ती करीता वीज वारंवार खंडित होत असते. त्यामुळे थ्रीफेजवर चालणारे पंप व उद्योधंदे बंद राहत असल्याने शेतकरी व नागरीकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यासोबतच पाणीटंचाईची समस्या निर्माण होत आहे.
सोमवारी वादळी पावसाने खंडित झालेला थ्रीफेजचा वीजपुरवठा गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत चालू झाला नव्हता. त्यामुळे येथे पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. गावातील नळांना आठ दिवसांआड पाणीपुरवठा होत असून, त्यातही विजेचा खेळखंडोबा झाल्यास बारा ते चौदा दिवसानंतर नळांना पाणी येत आहे. यासंदर्भात सरपंच बलभीम पटवारी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, आलूर उपकेंद्रातून केला जाणारा थ्रीफेजचा वीजपुरवठा मागील तीन दिवसांपासून बंद आहे. गुरुवारी सायंकाळी चार वाजता सुरु होणारा वीजपुरवठा सहा वाजेपर्यंत बंदच होता. दर पाच मिनिटांनी भार वाढल्याने वीज खंडित होते. त्यामुळे साठवण तलाखालील पाणीपुरवठ्याचे पंप सतत बंद राहात असल्याने गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. विजेच्या कमी दाबामुळे मागील आठ दिवसात कुपनलिकांचे तीन पंप जळाले आहे. वीजपुरवठा सुरळीत व नियमितपणे झाल्यास पाणीटंचाईचा समस्या दूर होईल. यासंदर्भात मुरुम येथील महावितरण कार्यालयातील ग्रामीणचे कनिष्ठ अभियंता सागर सायगावकर यांच्याशी संपर्क केला असता त्यांचे मोबाईल नॉटरिचेबल होते.
कोट.....
वीजपुरवठा खंडित झाल्याची माहिती मला मिळाली नाही. आपल्या माध्यमातूनच थ्रीफेजचा वीज पुरवठा तीन दिवसांपासून बंद असल्याचे समजले. मी माहिती घेऊन सांगतो.
आर. एम. शेंडेकरश उपकार्यकारी अभियंता, उमरगा
क्षमतावाढीचे काम निधीअभावी थांबले
उपकेंद्रावर भार वाढल्याने काही भागातील रोहित्राचा वीजपुरवठा बंद करुन वीजपुरवठा केला जात आहे. तरी देखील समस्या कायम आहे. आलूर उपकेंद्रांची क्षमता वाढ करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठवण्यात आला आहे. निधीअभावी उपकेंद्रांची क्षमतावाढ करण्याचे काम गेल्या अनेक वर्षापासून थांबले आहे. यासंदर्भात उमरगा आमदार ज्ञानराज चौगुले म्हणाले, उमरगा व लोहारा तालुक्यातील रोहित्राची क्षमतावाढ करण्याकरीता ऊर्जा विभागाकडून जवळपास १५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. निविदा प्रक्रियेनंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.