असमताेल पावसामुळे लाखाे हेक्टरवरील खरीप पिके धाेक्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:39 IST2021-07-07T04:39:56+5:302021-07-07T04:39:56+5:30
उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच ...

असमताेल पावसामुळे लाखाे हेक्टरवरील खरीप पिके धाेक्यात
उस्मानाबाद - जिल्ह्यात आजवर २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली आहे. परंतु, पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने डाेळे वटारले. त्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. एवढेच नाही, तर माळरानावरील काेवळ्या पिकांनी माना टाकण्यास सुरुवात केली आहे. मागील आठ-दहा दिवसानंतर साेमवारी जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. या पावसामुळे पिकांना जीवनदान मिळाले आहे; मात्र पिकांच्या जाेमदार वाढीसाठी सर्वदूर दमदार पावसाची गरज शेतकऱ्यांतून व्यक्त केली जाऊ लागली आहे.
जून महिना उजाडताच जिल्ह्यात पावसाला सुरुवात झाली. काही भागात पेरणीयाेग्य पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी चाड्यावर मूठ धरली. यानंतर अधून-मधून झालेल्या पावसामुळे खरीप पिकांची बऱ्याकी वाढ झाली. असे असतानाच मागील आठ-दहा दिवसांपासून वरूणराजाने डाेळे वटारले. परिणामी सुमारे २ लाख १० हजार हेक्टर क्षेत्रावरील खरीप पिके अडचणीत आली आहेत. माळरानावरील उडीद, मूग यासारखी पिके माना टाकू लागली आहेत. दरम्यान, साेमवारी दुपारी व सायंकाळच्यासुमारास जिल्ह्याच्या काही भागात पावसाच्या सरी काेसळल्या. मात्र, हा पाऊस सर्वदूर झालेला नाही. त्यामुळे खरीप पिके जाेमदार येण्यासाठी माेठ्या व सर्वदूर पावसाची गरज शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. येत्या दाेन-तीन दिवसांत पाऊस न झाल्यास पिकांना माेठा फटका बसेल, वेळप्रसंगी दुबार पेरणी करावी लागेल, असे शेतकरी सांगताहेत.
चाैकट...
साेयाबीनचा पेरा अधिक...
जिल्ह्यात साेयाबीनचे २ लाख ४६ हजार हेक्टर एवढे सर्वसाधारण क्षेत्र आहे. गतवर्षी साेयाबीनला मिळालेल्या उच्चांकी भावामुळे यंदाही बहुतांश शेतकऱ्यांनी साेयाबीनवरच भर दिला आहे. कृषी विभागाच्या अंतिम पेरणी अहवालानुसार २ लाख ९ हजार ५०० हेक्टर क्षेत्रावर साेयाबीन पेरणी झाली आहे. इतर पिकांच्या तुलनेत साेयाबीन पिकाखालील क्षेत्र काही पटीने अधिक आहे.
...तर दुबार पेरणीचे संकट
यंदा वेळेवर पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे साेयाबीन उत्पादक अनेक शेतकरी उडीद, मूग यासारख्या नगदी पिकांकडे वळले. ही पिके वाढीच्या अवस्थेत असतानाच पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे खासकरून हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिके काेमेजून चालली आहेत. आणखी तीन-चार दिवस पावसाची कृपा न झाल्यास माळरानावरील पिके पूर्णपणे वाया जातील, अशी भीती शेतकऱ्यांना आहे. दुर्दैवाने असे झाल्यास दुबार पेरणीची नामुष्की अगाेदरच अडचणीत असलेल्या बळीराजावर येऊ शकते.
देव अशी परीक्षा दरवर्षी घेताे
१. यंदा वेळेवर पाऊस झाल्यामुळे साेयाबीनला बगल देऊन जवळपास पाच एकरावर उडीद पीक घेतले. अधुनमधून पडलेल्या पावसामुळे हे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील आठ-दहा दिवसांत पावसाने दडी मारल्याने सध्या ही पिके काेमेजून चालली आहेत. त्यामुळे सध्या या पिकांसाठी माेठ्या पावसाची गरज आहे. अन्यथा पिके वाया गेली असती.
- बळीराम साेन्ने, शेतकरी.
२. खरीप पेरणीसाठीसाठी सुमारे २५ ते ३० हजार रुपये खर्च करून बी-बियाणे, खत खरेदी केले. ट्रॅक्टरच्या साहाय्याने पेरणी केली. साेयाबीन, मुगाचे पीकही जाेमदार आले. परंतु, मागील काही दिवसांपासून पाऊस झालेला नाही. त्यामुळे मुगाचे पीक काेमेजले आहे. येत्या चार-पाच दिवसांत दमदार पाऊस न झाल्यास पिकांचे माेठे नुकसान हाेईल.
- संताेष कदम, शेतकरी.
काेट...
जिल्ह्यात आजवर एकूण १३५ मिमी पाऊस झाला आहे. या पावसावर शेतकऱ्यांनी खरीप पेरणी उरकली. पिकेही जाेमदार आली. परंतु, मागील काही दिवसांत पाऊस झालेला नाही. त्यामुळे माळरानावरील पिके माना टाकू लागली आहेत. अशा पिकांसाठी सध्या माेठ्या पावसाची गरज आहे.
-डाॅ. टी. जी. चिमनशेट्टे, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद.