येरमाळा : येथील विद्युत उपकेंद्रातून होणारा वीज पुरवठा सातत्याने खंडित होत असून, मागील तीन दिवसांपासून थ्रीज फेज वीज पुरवठादेखील बंद आहे. यामुळे या भागात नागरिकांसह जनावरांच्या पाण्याच्या पाण्याचा प्रश्नदेखील बिकट बनला आहे. शिवाय, नागरिकांना इतरही अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
येरमाळासह परिसरातील अनेक गावांना कळंब येथील १३२ के. व्ही. उपकेंद्रातून विद्युत पुरवठा केला जातो. या विद्युत लाईनवर आठ विद्युत उपकेंद्र जोडली गेली आहेत. ही लाईन ७० वर्षांपूर्वीची असल्याने सद्यस्थितीत वीज वाहिन्या जीर्ण झाल्या आहेत. दरम्यान, सध्या लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिक घरात बसून आहेत. त्यातच उन्हाचा पारा वाढला आहे. यामुळे उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा स्थितीत सातत्याने वीज पुरवठा खंडीत होत असल्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मागील तीन दिवसांपासून थ्री फेज वीज पुरवठादेखील बंद असल्यामुळे अनेक गावांत पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे यावर कायमस्वरूपी तोडगा काढून वीज पुरवठ्याची समस्या मार्गी लावावी, अशी मागणी होत आहे.
चौकट.........
येडशीहून होणारा वीज पुरवठाही बंद
येरमाळा गावासाठी येडशी येथून पर्यायी वीज पुरवठ्याची सोय करण्यात आली आहे. परंतु, रब्बी हंगामात ऐन पिकांना पाणी देण्याच्या वेळेत काही लोकप्रतिनिधींनी भार जास्त होत असल्याचे कारण देत हा पुरवठा बंद केला. दरम्यान, आता शेतीचा कसलाही भार नसल्याने ही पर्यायी व्यवस्था चालू करावी, अशी मागणी होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंता महेंद्र वाघमारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी कळंब येथील सहायक अभियंता पाटील यांच्याशी चर्चा करून कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था करण्याबाबत निर्णय घेऊ, असे सांगितले.