‘कोरोनामुक्त गाव’साठी ९४ गावांत पोहोचले गुरुजी अन् ताई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:33 IST2021-04-22T04:33:40+5:302021-04-22T04:33:40+5:30
ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या स्थितीत स्थापित व कार्यान्वित आरोग्य यंत्रणा वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत तोकड्या पडत ...

‘कोरोनामुक्त गाव’साठी ९४ गावांत पोहोचले गुरुजी अन् ताई
ग्रामीण भागात कोरोनाचा झपाट्याने प्रसार होत आहे. या स्थितीत स्थापित व कार्यान्वित आरोग्य यंत्रणा वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत तोकड्या पडत असल्याने साखळी तोडण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही. एकीकडे स्थिती अशी गंभीर वळणावर जात असताना ग्रामीण भागात मात्र प्रशासनाने दिलेल्या निर्देशांची अंमलबजावणी कोणी करावयाची, असा प्रश्न उभा ठाकला होता.
यातच ट्रेसिंग, बाधितांच्या जवळचा सहवास लाभलेल्यांचा शोध घेणे गरजेचे बनले होते. मास्क, फिजिकल डिस्टन्स व दंडात्मक कारवाया याविषयीदेखील सर्वकाही ‘मोकाट’ स्थिती निर्माण झाली होती. यामुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांनी प्रत्येक गावात ५० कुटुंबांसाठी प्रत्येकी एक ‘पर्यवेक्षक’ नियुक्त करावा व त्यावर निरीक्षण व कार्यवाही करण्यासाठी ‘ग्रामपालक अधिकारी’ नियुक्त करावेत, असे आदेश दिले आहेत. यानुसार, तालुक्यातील ९१ ग्रामपंचायतींच्या अंतर्गत येणाऱ्या ९४ गावांत स्थानिक सरपंच, ग्रामसेवक व मुख्याध्यापक यांनी नियोजन करत प्रत्येक ५० कुटुंबांसाठी एक याप्रमाणे पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. त्यांना यासंबंधी आदेश निर्गमित करत, यामध्ये पार पाडावयाची जबाबदारी नमूद करण्यात आली आहे. यात पर्यवेक्षक मंडळींत गावातील खाजगी, जि.प. शाळेतील शिक्षक, अंगणवाडीताई, मदतनीस व आशाताई यांचा समावेश करण्यात आला आहे.
५९५ शिक्षकांच्या खांद्यावर भार
ग्रामीण भागात राबवला जाणारा ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रम मागच्या चार दिवसांपासून अमलात आला आहे. यासाठी पर्यवेक्षक म्हणून तालुक्यातील खाजगी व जि.प. शाळांतील ५९५ शिक्षकांना नियुक्त करण्यात आले आहे. सदर शिक्षकांनी आपापल्या गावात, आपल्या वाटेला आलेल्या कुटुंबांस भेट देण्यास सुरुवात केली आहे. याशिवाय आशाताई, अंगणवाडीताई व मदतनीस यांनाही पर्यवेक्षक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
या मुद्यांवर आहे भर
या उपक्रमांतर्गत शिक्षक व इतर पर्यवेक्षक घरोघरी जात कुटुंबप्रमुखाचे नाव व सदस्य, वय या वैयक्तिक माहितीसह सर्दी, ताप, खोकला, बीपी, शुगर, इतर आजार, अंगदुखी आहे का, यासह ऑक्सिजनस्थिती, लसीकरण झालं का, याची नोंद घेत आहेत.
काम 'प्रॉपर' झालं तरच...
‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ हा उपक्रम परिणामकारकरीत्या राबवला, तर याचा खूप चांगला ‘इम्पॅक्ट’ मिळणार आहे. परंतु, या पर्यवेक्षकांना कुटुंबांतील व्यक्तींनी खरी माहिती न सांगितल्यास किंवा कर्मचाऱ्यांकडून हलगर्जीपणा झाल्यास या उपक्रमाची अपेक्षित फलनिष्पत्ती मिळणार नाही. यामुळे वरिष्ठांनी याच्या ‘क्रॉसचेक’वर भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
प्रतिक्रिया
तालुक्यातील सर्व गावांत ‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रमांतर्गत पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. यानुसार, प्रत्येकाला ५० कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली आहे. याशिवाय, सर्वेक्षणाचे कामही करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येकाच्या कामकाजाचा पंचायत समितीस्तरावर दैनंदिन आढावा घेतला जात आहे.
- एन.पी. राजगुरू, गटविकास अधिकारी, कळंब