किराणा, फळ, दूध आता दुपारी २ पर्यंतच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:43+5:302021-04-17T04:32:43+5:30
उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात काही अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना, विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू खरेदीच्या बहाण्याने लोकांची ...

किराणा, फळ, दूध आता दुपारी २ पर्यंतच
उस्मानाबाद : लॉकडाऊन काळात काही अत्यावश्यक वस्तूंच्या दुकानांना, विक्रेत्यांना मुभा देण्यात आली आहे. मात्र, या वस्तू खरेदीच्या बहाण्याने लोकांची गर्दी होत असल्याचे सांगत, जिल्हाधिकाऱ्यांनी वैद्यकीय, पाणीपुरवठा व अन्य सहा अत्यावश्यक सेवांनाच २४ तास परवानगी जारी केली आहे. त्यामुळे उर्वरित दुकाने आता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच उघडी राहतील.
१४ एप्रिलच्या रात्रीपासून राज्य शासनाच्या निर्देशानुसार लॉकडाऊन व विहीत वेळेत संचारबंदी लागू करण्यात आली आहे, तसेच अत्यावश्यक सेवेतील दुकाने व सेवांना सकाळी ७ ते रात्री ८ वाजेपर्यंत मुभा देण्यात आली आहे. दरम्यान, आता किराणा, दूध, भाजीपाल्याच्या नावाखाली नागरिकांचा सर्रास वावर सुरू असल्याचे चित्र शहरातून दिसून येत आहे. ग्रामीण भागातही काही वेगळे चित्र नाही. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी वर्दळ कमी करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारी नवीन आदेश काढले आहेत. या आदेशानुसार आता वैद्यकीय, विद्युत, पाणीपुरवठा, सार्वजनिक वाहतूक, गॅस, पेट्रोल आदी सेवांनाच मुभा देऊ केली आहे. उर्वरित सर्व अत्यावश्यक सेवा या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच सुरु ठेवता येणार आहेत.
पूर्णवेळ काय सुरू...
दवाखाने, मेडिकल, वैद्यकीय विमा कार्यालये, ऑप्टिकल्स तसेच आरोग्य सेवेकरिता आवश्यक उत्पादने निर्मिती व वितरणासाठीचे घटक, त्यांची वाहतूक. विमान, रेल्वे, टॅक्सी, ऑटोरिक्षा, बसेस. मालवाहतूक, पाणीपुरवठा सेवा, एटीएम, विद्युत सेवा, गॅस सिलेंडर पुरवठा. या सर्व घटकांत काम करणार्या कर्मचार्यांनी ओळखपत्र बाळगणे बंधनकारक. उस्मानाबादेतील पोलीस पेट्रोलपंप. नगरपालिका व नगरपंचायतीच्या हद्दी जेथे संपतात तेथून १० किमी अंतरापुढील राज्य व राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंप.
अर्धवेळेत कोणत्या सेवा...
किराणा दुकान, दूध, भाजीपाला, फळे, बेकरी, शेतीविषयक वस्तू, उत्पादन विक्रीची दुकाने, अन्नपदार्थांची पार्सल सेवा, नगरपालिका, नगरपंचायत हद्दीपासून १० किमीच्या आतील सर्व पेट्रोलपंप व यापूर्वी राजय शासनाने सूट दिलेल्या अत्यावश्यक सेवेतील उर्वरित आस्थापना या सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेतच सुरु राहतील. दुपारी २ वाजल्यानंतर या सर्व सेवा देणाऱ्या आस्थापना बंद कराव्या लागतील, तसेच यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही संचारावर निर्बंध असणार आहेत. याचे उल्लंघन केल्यास कार्यवाही होईल.