कार्डवरील चार आकडे सांगितले अन् दाेन मिनिटांत ७० हजार गायब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST2021-04-04T04:33:48+5:302021-04-04T04:33:48+5:30
कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार ...

कार्डवरील चार आकडे सांगितले अन् दाेन मिनिटांत ७० हजार गायब
कळंब (जि. उस्मानाबाद) : तुमच्याडील क्रेडिट कार्ड तुमचेच आहे का याची खात्री करावी लागेल व यासाठी कार्डचे शेवटचे चार क्रमांक सांगा, अशी एक तरुणी मोबाइलवर बोलली. यावर विश्वास ठेवत चार अंक सांगताच दोन मिनिटांत ७० हजार रुपये बँक खात्यावरून गायब झाल्याचा प्रकार पानगाव येथील एका तरुणाच्या राशीला आला आहे. याप्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पानगाव येथील अनिल गंगाधर चौधरी हा ३२ वर्षीय युवक कळंब येथे एका नामांकित फायनान्स कंपनीत एक्झिक्युटिव्ह म्हणून नोकरीला आहे. चौधरी हे पुणेस्थित एका खाजगी बँकेच्या क्रेडिट कार्डचा वापर करतात. आपल्या नियमित कामकाजात असताना गुरुवारी दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी अनिल यांच्या मोबाइलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला.
यावेळी समोरून एक तरुणी बोलत होती. तिने अनिल चौधरी वापरत असलेल्या क्रेडिट कार्डच्या बँकेचे नाव घेत ‘मी बँकेकडून बोलत आहे. तुमच्या क्रेडिट कार्डला इन्शुरन्स आहे. त्यासाठी १२० रुपये प्रतिमहिना भरावा लागत होता. तो आत ७५० रुपये भरावा लागेल,’ असे सांगितले.
यावर अनिल चौधरी यांनी मला हा ७५० रुपये प्रतिमहिन्याचा इन्शुरन्स नको, असे प्रतिउत्तर दिले. यावेळी समोरून संवाद साधणाऱ्या महिलेने यासाठी मग आपला इन्शुरन्स बंद करावा लागेल व यासाठी हे कार्ड आपलेच आहे का? याची खात्री करावी लागेल, असे म्हटले. यासाठी क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगा, असे तरुणीने सांगितले. यावर अनिल चौधरी यांनी ओटीपी येईल या भरवशावर क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगितले. यानंतर मात्र काही क्षणातच म्हणजेच १२ वाजून ५३ मिनिटांनी अनिल यांच्या खात्यावरून ५० हजार २२५ रुपये वळती झाल्याचा संदेश आला. या धक्क्यातून सावरतात न सावरतात तोच दोन मिनिटांनी आणखी २० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश आला. एकूणच क्रेडिट कार्डचे शेवटचे चार अंक सांगताच अवघ्या दोन मिनिटांच्या फरकाने, दोन प्रयत्नात अनिल चौधरी यांचे ७० हजार ७२५ रुपये लंपास झाले.
याप्रकरणी अनिल चौधरी यांनी येरमाळा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सपोनि. गणेश मुंडे यांच्या मार्गदर्शनानुसार भादंविचे ४१९, ४२०, माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००८ च्या ६६ (क), ६६(ड) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.