चार दिवसांत चौघांचा कोरोनाने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:29 IST2021-04-26T04:29:22+5:302021-04-26T04:29:22+5:30
येडशी : येथे गेल्या दोन दिवसांत चौघांचा कोरोनाने बळी घेतला असून, यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे. येथील ...

चार दिवसांत चौघांचा कोरोनाने मृत्यू
येडशी : येथे गेल्या दोन दिवसांत चौघांचा कोरोनाने बळी घेतला असून, यामुळे ग्रामस्थांत भीतीचे वातावरणात निर्माण झाले आहे.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत आतापर्यंत ४५३ जणांना कोरोनाची बाधा झाली असून, यामध्ये सर्वांत जास्त येडशी गावात २२४ रुग्ण आहेत. या पाठोपाठ जवळा (दु) येथे ११, आळणी ६६, कुमाळवाडी ३, जहांगीरवाडी २०, उपळा (मा) ६४ तर शिंगोली ताडा येथे ४ जण बाधित आहेत. सध्या ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १०८ इतकी असून, यात येडशीतील ३१ जणांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला. यात येडशीगावातील १२ जण असून, याशिवाय बार्शी, सोलापूर आदी ठिकाणी काही रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे एकूणच कोरोनाची स्थिती गंभीर बनत चालली आहे. असे असतानाही गावात विनाकारण फिरणाऱ्यांना मात्र याची कसलीही भीती नसल्याचे दिसत आहे. शिवाय, मागील काही दिवसांपासून आरोग्य केंद्रात लस व अँटिजन तपासणी किटचाही तुटवडा निर्माण झाला आहे.
दरम्यान, वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे व तहसीलदार गणेश माळी यांनी नुकताच उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी अनेक त्रुटी दिसल्याने संबंधित अधिकारी व पदाधिकारी यांना चांगलेच पैलावर घेऊन कडक उपाययोजना राबविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. यानुसार ग्रामपंचायतीने अनेक ठिकाणी गावात येणारे रस्ते बंद केले असून, चौकात हिंडणाऱ्यांची संख्या मात्र अद्याप कमी होताना दिसत नाही.