बाधितांच्या कुटुंबातील लाेक अकारण पडताहेत घराबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:34 IST2021-05-06T04:34:36+5:302021-05-06T04:34:36+5:30
कळंब : गावातील कोरोना वाढला आहे. या स्थितीत बाधितांच्या घरातील लोक बाहेर फिरत आहेत. रस्त्यावर थुंकणे अन् अकारण भटकंती ...

बाधितांच्या कुटुंबातील लाेक अकारण पडताहेत घराबाहेर
कळंब : गावातील कोरोना वाढला आहे. या स्थितीत बाधितांच्या घरातील लोक बाहेर फिरत आहेत. रस्त्यावर थुंकणे अन् अकारण भटकंती करण्याचा प्रकार सुरूच आहे. यामुळे गाव वाचवण्यासाठी एखाद्या पोलीस कर्मचाऱ्याची नेमणूक करावी, अशी मागणी हावरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते संदीप कोकाटे यांनी केली आहे. मागणीचे हे निवेदन कळंब तहसीलदार व हावरगाच्या सरपंचास देण्यात आले.
हावरगावात सातत्याने रुग्ण वाढत आहेत. बघता-बघता रुग्णसंख्या ३४ वर गेली आहे. तसेच एका व्यक्तीचा मृत्यू झाला. असे असतानाही गावात सुपारी, गुटखा खावून सर्रास सार्वजनिक ठिकाणी थुंकले जात आहे. विनाकारण व विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. बाधितांच्या घरातील लोक चाचणी करून घेण्यास नकार देत गावात फिरत आहेत. एकूणच ही सर्व स्थिती न सुधारल्यास गावातील कोरोना नियंत्रणात येणे शक्य नाही.
यामुळे गावाला कोरोनाच्या संकटापासून वाचवण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त गरजेचा झाला आहे. त्यामुळे आमच्या गावाला पोलीस बंदोबस्त द्यावा, अशी मागणी सरपंच, तहसीलदार यांच्याकडे केली आहे.
चौकट....
ग्रामीण भागात बंदोबस्ताची गरज...
कळंब तालुक्यातील हावरगाव येथे जाणवत असलेली परिस्थिती इटकूर या लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या गावात निर्माण झाली असून, या ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची गरज व्यक्त केली जात आहे. किमान या बीटला दोन पूर्णवेळ कर्मचारी दिल्यास आसपासच्या गावातसुद्धा याचा फरक पडणार आहे.