सरपंचपदाच्या दृष्टीने उमेदवार निवडीवर भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:30 IST2020-12-29T04:30:05+5:302020-12-29T04:30:05+5:30

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा ...

Emphasis on selection of candidates for the post of Sarpanch | सरपंचपदाच्या दृष्टीने उमेदवार निवडीवर भर

सरपंचपदाच्या दृष्टीने उमेदवार निवडीवर भर

उमरगा : तालुक्यात ४९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत असून, आपल्याच पक्षाच्या कार्यकर्त्यांची वर्णी ग्रामपंचायतच्या सत्ताकेंद्रावर लागावी, यासाठी गावपातळीवरील प्रत्येक पक्षाचा गावपुढारी प्रयत्न करीत आहे. दरम्यान, यंदा पहिल्यांदाच सरपंच आरक्षण निवडणुकीनंतर निघणार असल्याने त्या दृष्टीनेच उमेदवारांचा शोध देखील घेतला जात आहे. तालुक्यातील तुरोरी, मुळज, बलसुर, दाळींब, गुंजोटी या मोठ्या गावातही ग्रामपंचायत निवडणुका होत असून, व्यापाऱ्यांचे गाव म्हणून ओळख असलेल्या तुरोरी येथे मागील तीस वर्षांपासून काँग्रेस व सेना आलटून पालटून सत्तेवर येतात. यावेळी मात्र येथे काँग्रेस व राष्ट्रवादी, शिवसेना व भाजप यांनी पॅनल तयार केले असून, व्यापारी महासंघाने ही आपले स्वतंत्र पॅनल उतरविल्याने निवडणुकीत मोठी चुरस निर्माण झाली आहे. दुसरीकडे गावातील प्रतिष्ठित व नागरिकांनी निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्या अनुषंगाने तिन्ही पॅनलच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या जात असून, येत्या दोनचार दिवसात काय निर्णय होतो हे कळणार आहे

भाजपचे नेते कै. शिवाजीदादा चालुक्य व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाबा पाटील यांचे गाव असलेल्या मुळज येथेही निवडणूक होऊ घातली आहे. या दोन नेत्यांच्या प्रभावाखाली हे गाव विभागले गेले असले तरी दिवंगत शिवाजीदादा चालुक्य यांचे सुपुत्र व जिल्हा परिषदेचे माजी सभापती अभय चालुक्य यांनी मागील निवडणुकीत एकहाती सत्ता मिळविली होती. यावेळी या दोन्ही नेत्यांत मनोमिलन झाल्याचे दिसून येते. त्यातूनच ग्रामपंचायत बिनविरोध करण्यासाठी त्यांच्यात बोलणी चालू असली तरी काँग्रेसचाही येथे प्रभाव असल्याने त्यांनीही पॅनलची तयारी सुरू केली आहे.

गुंजोटी या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतीवर सध्या काँग्रेस व शिवसेनेचा प्रभाव आहे. येथे मागील पाच वर्षात काँग्रेसची सत्ता होती. याही वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी एकत्रित लढत असून, शिवसेनेनेही जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. दरम्यान, यावेळी माजी सैनिक देखील ग्रामपंचायतच्या निवडणूक मैदानात उतरत असून, गावात माजी सैनिकांची संख्या लक्षणीय असून असल्याने स्वतंत्र पॅनल तयार करून मैदानात उडी घेतली आहे. त्यामुळे मोठी चुरस निर्माण झाली आहे. यासोबतच दाळींब व बलसूर या गावात राष्ट्रवादीचा मोठा प्रभाव असून, येथे राष्ट्रवादीने जोरदार फिल्डिंग लावली असली तरी काँग्रेस व शिवसेनेकडूनही मोर्चेबांधणी सुरू आहे. त्यामुळे तालुक्यातील या मोठ्या गावात सर्वच पक्षांनी आपापली सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न चालविले असून, सरपंचपदाचे आरक्षण निवडणूक झाल्यानंतर जाहीर होणार असल्याने राजकीय पक्ष प्रत्येक गावातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून सरपंचपदाचे आरक्षण व त्यासाठी आवश्यक असलेल्या आपल्या गटातील माणूस कोण, याचा शोध घेत आहेत.

४९ ग्रामपंचायतींची निवडणूक

१७१ प्रभाग

४५३ सदस्य

९०७८० एकूण मतदार

४२६५३ महिला

४८१२७ पुरूष

Web Title: Emphasis on selection of candidates for the post of Sarpanch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.