घरांचे हस्तांतरण, भूकंपग्रस्त प्रमाणपत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:33 IST2021-09-11T04:33:54+5:302021-09-11T04:33:54+5:30
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ साली महाप्रलयंकारी भूकंप झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यांत ‘अ’ व ‘ब’ वर्गवारी असलेल्या ...

घरांचे हस्तांतरण, भूकंपग्रस्त प्रमाणपत्राबाबत जिल्हाधिकाऱ्यांसोबत शिष्टमंडळाची चर्चा
उस्मानाबाद व लातूर जिल्ह्यात ३० सप्टेंबर १९९३ साली महाप्रलयंकारी भूकंप झाल्यानंतर या दोन्ही तालुक्यांत ‘अ’ व ‘ब’ वर्गवारी असलेल्या गावांना महाराष्ट्र शासन व स्वयंसेवी संस्थांच्या वतीने घरे बांधून दिली होती. यामध्ये प्रामुख्याने उमरगा तालुक्यातील ‘अ’ वर्गवारीचे १० व ब वर्गवारीमध्ये ९, तर लोहारा तालुक्यामध्ये ‘अ’ वर्गवारीमध्ये १६ आणि ‘ब’ वर्गवारीमध्ये ३ अशा एकूण ३८ गावांचा समावेश आहे.
भूकंपामुळे एकूण २५ हजार १७० घरे बाधित झाली होती. याच्या दुरुस्तीसाठीही अ, ब व क वर्गवारी करण्यात आली. ‘अ’ वर्गवारी मध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेल्या गावांची, ‘ब’ वर्गवारी मध्ये ७० टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झालेल्या गावांची तर ‘क’ वर्गवारी मध्ये अंशतः नुकसान झालेल्या घरांची दुरुस्ती करण्यात आली. तसेच उमरगा व लोहारा तालुक्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गवारीतील एकूण २० हजार ४६० घरांचे वाटप करण्यात आले. सदर घरासंदर्भात हस्तांतरण वाटणी करण्यास प्रतिबंध असल्याने अनेक अडचणी येत आहेत. अशा बांधून दिलेल्या घरांची विक्री करण्यासाठी शासनाने कोणताही शासन निर्णय निर्गमित केलेला नाही. त्यामुळे उमरगा व लोहारा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना वारसा हक्क मंजूर करणे तसेच हस्तांतरण, वाटणीपत्र, बक्षीसपत्र, दानपत्र व गहाणखत विषयक हस्तांतरण संदर्भात लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाने १ ऑक्टोबर २०१७ रोजी आदेश काढून लातूर जिल्ह्यातील भूकंपग्रस्त गावांचा प्रश्न मार्गी लावला आहे.
लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाचा आदेश निघून जवळपास चार वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे आपणही आपल्या स्तरावर लातूर जिल्हाधिकारी यांनी काढलेल्या आदेशाप्रमाणे उस्मानाबाद जिल्ह्यासाठी आदेश काढून उमरगा व लोहारा तालुक्यातील ‘अ’ व ‘ब’ वर्गवारीतील ३८ गावांतील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घराचे हस्तांतरण करण्यासाठी परवानगी देण्यासंदर्भात तसेच घरांची खरेदी-विक्री करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करावेत. तसेच मूळ लाभार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, तालुकाध्यक्ष सुनील साळुंके, भूकंपग्रस्त कृती समितीचे अमर बिराजदार, गोविंद साळुंके, अजित जाधव, जगदीश पाटील, गिरीश भगत, सचिन रणखांब, किसन पवार संजय जाधव यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. याप्रसंगी जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. मी स्वतः विभागीय आयुक्त यांच्याशी बोलून व लातूर जिल्हाधिकारी कार्यालयाशी संपर्क साधून त्यांच्याकडील माहिती प्राप्त करून हा विषय तत्काळ मार्गी लावतो, असे आश्वासन दिले.
कोट.........
लोहारा व उमरगा तालुक्यातील भूकंपग्रस्त लाभार्थ्यांना घरांचे हस्तांतरण करणे, मूळ लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसास भूकंपग्रस्त प्रमाणपत्र देणे या मागणीसंदर्भात भूकंपग्रस्त भागातील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांची भेट घेतली. याप्रकरणी सकारात्मक मार्ग काढून हा महत्त्वाचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी यावेळी दिले आहे.
- सुनील साळुंके, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, लोहारा