गर्दीला आवर घालण्यासाठी पथक तैनात करण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:34 IST2021-05-07T04:34:24+5:302021-05-07T04:34:24+5:30

कळंब - कोरोनाच्या नियंत्रणासाठी गर्दी होणाऱ्या रस्त्यावर कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय इटकूर ग्रामपंचायतीने घेतला आहे. या माध्यमातून ...

The decision to deploy a squad to contain the crowd | गर्दीला आवर घालण्यासाठी पथक तैनात करण्याचा निर्णय

गर्दीला आवर घालण्यासाठी पथक तैनात करण्याचा निर्णय

कळंब - कोरोनाच्या नियंत्रणासाठी गर्दी होणाऱ्या रस्त्यावर कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्याचा निर्णय इटकूर ग्रामपंचायतीने घेतला आहे. या माध्यमातून रस्त्यांवरील गर्दी कमी हाेण्यास मदत हाेईल, असा विश्वास पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला.

तालुक्यातील लोकसंख्या व आकाराने मोठ्या असलेल्या गावांतही कोरोनाचा प्रकोप वाढत चालला. शिराढोण, मोहा येथील स्थितीचे अवलोकन करीत इटकूर येथील ग्रामपंचायतने सद्य:स्थितीत नियंत्रित असलेल्या आपल्या गावातील स्थिती बिघडू द्यायची नाही, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

यानुसार ‘माझे गाव, कोरोनामुक्त गाव’ या उपक्रमांतर्गत शाळेच्या मैदानात बैठक घेण्यात आली. यावेळी उपसरपंच विलास गाडे, ग्रामविकास अधिकारी बाबूभाई शेख, तलाठी प्रवीण पालखे, पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मण आडसूळ, तंटामुक्त समितीचे अध्यक्ष प्रभाकर बावळे यांच्यासह सर्व शिक्षक, आशाताई, अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत रुग्णसंख्या, तपासणी, ट्रेसिंग, पर्यवेक्षकांची कामे यांविषयी चर्चा करीत करण्यात आली. अडचणी जाणून घेत पुढील काळातील रणनीती ठरविण्यात आली. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना सोबत घेत प्रयत्न करण्याचे निश्चित करण्यात आले.

चौकट...

वर्दळीच्या ठिकाणी पथक थांबणार

इटकूर येथील बाजार मैदान, ग्रामपंचायतीचा परिसर, शिवाजी चौक, बसस्टँड, आदी भागांत अकारण गर्दी केली जाते. या भागासह गावाचे एंट्री पॉइंट असणाऱ्या भागांत कोरोना कक्षातील शिक्षकांचे पथक तैनात राहणार आहे. त्यांना ग्रामपंचायतीने दंडात्मक कारवाईचे अधिकार दिले आहेत. यात ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, तंटामुक्त समितीचे अध्यक्षही सोबत असणार आहेत. यासाठी पाच पथके स्थापन करण्यात आली आहेत.

कट्ट्यावर, ओट्यावर काळे वंगण

सकाळी आणि सायंकाळच्या सुमारास गावातील बाजारकट्टे, दारासमोरील ओटे, बाकडे यांवर सोशल डिस्टन्स न पाळता अकारण बसणाऱ्यांची संख्या काबूत आणण्यासाठी ग्रामपंचायतीने अशा जागांवर काळे, जळालेले वंगण, ऑईल टाकण्याचा निर्णय घेत त्याचा अंमल सुरू केला आहे. यामुळे रिकामटेकड्यांना थोडाबहुत आळा बसणार आहे.

गावात दवंडी अन् रूट मार्च

‘माझं गाव, कोरोनामुक्त गाव’ उपक्रमांतर्गत गावातील लोकांना सूचना देण्यासाठी दुचाकीवरून दवंडी देण्यात आली. याशिवाय सर्व कर्मचारी, ग्रामपंचायतीचे पदाधिकारी यांनी गावातील प्रमुख भागांत रूट मार्च केला. कडक व दंडात्मक कारवाईसंदर्भात ग्रामस्थांना यावेळी अवगत करण्यात आले.

Web Title: The decision to deploy a squad to contain the crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.