शस्त्र बाळगण्याची क्रेझ, जिल्ह्यात हजार परवाने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:40 IST2021-07-07T04:40:46+5:302021-07-07T04:40:46+5:30
शस्त्र परवाना काढायचा कसा... शस्त्र परवाना काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची वेगवेगळ्या विभागामार्फत ...

शस्त्र बाळगण्याची क्रेझ, जिल्ह्यात हजार परवाने
शस्त्र परवाना काढायचा कसा...
शस्त्र परवाना काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा लागतो. या अर्जाची वेगवेगळ्या विभागामार्फत तपासणी होऊन खरेच अर्जदारास शस्त्राची गरज आहे का, हे शोधले जाते. त्यानंतर आलेल्या अहवालांच्या आधारे जिल्हाधिकारी निर्णय घेत असतात.
उस्मानाबादेत सर्वाधिक, तर वाशीत कमी...
शस्त्र परवान्यांची संख्या ही जिल्ह्यात सर्वाधिक उस्मानाबाद तालुक्यात आहे. त्यातही शहरात ही संख्या जास्त आहे. एकंदर तालुक्यात ३९० जणांकडे शस्त्र बाळगण्याचे परवाने आहेत.
यापाठोपाठ उमरगा तालुक्यात १६५, तुळजापूर तालुक्यात १३४ तर भूम तालुक्यात १११ शस्त्र बाळगण्याचे परवाने यापूर्वीच्या काळात देण्यात आले आहेत.
जिल्ह्यात सर्वात कमी परवाने हे वाशी तालुक्यात आहेत. येथे केवळ १५ जणांकडेच परवाने आहेत. लोहारा तालुक्यात १९, परंडा ६२ तर कळंब तालुक्यात ९३ जणांकडे शस्त्र बाळगण्याचे परवाने देण्यात आले आहेत.
नियम कडक झाल्याने इच्छुकांची कोंडी...
मागील साधारणत: पाच वर्षांमध्ये शस्त्र परवाना देण्याबाबतचे नियम काहीसे कठोर झाले आहेत. त्यामुळे सहजासहजी हे परवाने मिळत नाहीत. यापूर्वी महसूल, पोलीस विभागातील अधिकाऱ्यांची मर्जी संपादन केलेल्या लोकांना परवाना मिळविण्यात फारशी अडचण येत नव्हती. त्यामुळे फारसे सायास न करता जवळपास हजारेएक लोकांनी परवाने काढून घेतले आहेत.
पाच वर्षांत झाली संख्या कमी...
आजही शस्त्र मिळविण्यासाठी नागरिकांची धडपड चालूच असते. विशेषत: राजकीय, उद्योग, व्यापार क्षेत्रातील लोकांकडून परवान्यांसाठी सर्वाधिक अर्ज केले जातात. मात्र, अर्ज आल्यानंतर पोलीस व्हेरिफिकेशनचे दिव्य पार पाडावे लागते. तसेच अर्जदार राहणाऱ्या क्षेत्रातील काही अधिकाऱ्यांचा अभिप्राय मागविला जातो. खरेच अर्जदारास शस्त्राची गरज आहे का, याची चाचपणी केली जाते. या सर्व दिव्यातून जावे लागत असल्याने अलीकडच्या काळात संख्या घटली.
शस्त्र सांभाळणे कठीण...
शस्त्र परवाना मिळाल्यानंतर त्याच्या खरेदीपासून ते सांभाळ करण्यापर्यंतचे काम मोठे जोखमीचे आहे. वेळोवेळी आपल्याकडील शस्त्राची देखभाल-दुरुस्ती करून घ्यावी लागते. प्रशासनाने निवडणूक व तत्सम वेळी शस्त्रे जमा करावी लागतात. तसेच घरात किंवा सोबत असतानाही ते चोरीस जाणार नाही, याची मोठी काळजी घ्यावी लागते. कारण, चोरीस गेल्यानंतर या शस्त्राच्या माध्यमातून एखादा गुन्हा चोरट्याने केल्यास हकनाक परवानाधारक चौकशीच्या फेऱ्यात अडकतो.