रुग्णसंख्या वाढल्याने काक्रंबावासीयांत चिंता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2021 04:33 IST2021-04-04T04:33:51+5:302021-04-04T04:33:51+5:30
काक्रंबा : येथे मागील दहा-बारा दिवसांत कोरोनाचे तब्बल १५ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर ...

रुग्णसंख्या वाढल्याने काक्रंबावासीयांत चिंता
काक्रंबा : येथे मागील दहा-बारा दिवसांत कोरोनाचे तब्बल १५ रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसोबतच प्रशासनाचीदेखील चिंता वाढली आहे. त्यामुळे यावर उपाययोजना करण्याच्या दृष्टीने शनिवारी सलगरा प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांनी काक्रंबा येथील उपकेंद्रात ग्रामसेवक, मुख्याध्यापक, पोलीसपाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासमवेत बैठक घेतली. यावेळी आरोग्य विभागातील कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांचीही उपस्थिती होती.
तुळजापूरपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या काक्रंबा येथील जनतेचे सर्व व्यवहार, कामधंद्यासाठी तसेच तुळजापूर तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे विविध कार्यालयांत, बँकेच्या कामासाठी यासाठी येथील ग्रामस्थांना तुळजापूर शहर गाठावे लागते. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणावर कोरणाचा प्रादुर्भाव वाढत आहे. गेल्या २१ मार्च रोजी येथे पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दहा दिवसांत येथे १६ रुग्ण आढळल्याने गावात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. असे असले तरी बाधित रुग्णांचे नातेवाईक मात्र कुठलेही नियम न पाळता बिनधास्त गावात सर्वत्र वावरताना दिसत आहेत. इतर गावात संसर्ग वाढू नये यासाठी सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, पोलीसपाटील, मुख्याध्यापक तसेच आरोग्य विभागातील कर्मचारी यांची समिती गठित करण्यात आली आहे. येथे मात्र तशा कुठल्याही उपाययोजना केल्याचे दिसत नाही.
गावात एखाद्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर तो रुग्ण स्वत:च टमटममधून तुळजापूरला उपचारासाठी जात आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना राबविण्याबाबत सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.
दरम्यान, बैठकीस सरपंच अनिल बंडगर, ग्रामसेवक गोरेे, पोलीसपाटील प्रमोद खताळ ग्रा. पं. सदस्य बबलू घोगरे, उमेश पाटील, उमेश खांडेकर आरोग्य विभागातील कर्मचारी उपस्थित होते.