भाजप २० तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे ३३ ग्रामपंचायती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:34 IST2021-01-19T04:34:29+5:302021-01-19T04:34:29+5:30
कळंब : कळंब तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने यंदा जोरदार मुसंडी मांडली आहे. ५३ पैकी २० ग्रामपंचायती भाजप ...

भाजप २० तर महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडे ३३ ग्रामपंचायती !
कळंब : कळंब तालुक्यात झालेल्या ५३ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपने यंदा जोरदार मुसंडी मांडली आहे. ५३ पैकी २० ग्रामपंचायती भाजप पुरस्कृत पॅनलच्या ताब्यात गेल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात असून, महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या ताब्यात ३३ ग्रामपंचायती आल्या आहेत.
तालुक्यात या टप्प्यात ५९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातील ६ ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या. ५३ ग्रामपंचायतींसाठी १५ जानेवारी रोजी जवळपास ८० टक्के मतदारांनी मतदान केले. या निवडणुकीत तालुक्यातील येरमाळा, ईटकूर, मंगरूळ, नायगाव, दहिफळ या मोठ्या व राजकीय दृष्ट्या महत्वाच्या गावात गावपुढाऱ्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. येरमाळा येथे भाजपचे विकास बारकूल यांच्या पॅनलने विजय मिळविला. ईटकूर येथे तीन पॅनलमध्ये चुरस झाली. यात महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलला ८, काँग्रेसप्रणित आघाडीला ४ तर तिसऱ्या आघाडीला तीन जागा मिळाल्या.
मंगरूळमध्ये भाजपापुरस्कृत पॅनलकडे नऊ तर महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलकडे चार जागा आल्या. येथे भाजपचे भागचंद बागरेचा यांना पुन्हा बहुमत मिळाले. नायगावात भाजप पुरस्कृत पॅनल पाच, महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलकडे पाच तर एका जागेवर स्वतंत्र उमेदवार निवडून आला. दहिफळ येथे शिवसेना पुरस्कृत पॅनलला मतदारांनी कौल दिला.
आ. पाटील समर्थकांचे यश
आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्याबरोबर भाजपमध्ये गेलेल्या त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांना बहुतांश ग्रामपंचायती राखण्यात यश आले. त्यामुळे भाजपच्या ताब्यात यंदा मोठया प्रमाणात गावांचा कारभार येणार आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष अजित पिंगळे, बाजार समितीचे संचालक राहुल चव्हाण, अरुण चौधरी, कन्हेरवाडीचे ॲड. रामराजे जाधव आदींनी आपापले पॅनल निवडून आणले.
३१ ठिकाणी सेनेचा दावा
शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी कापसे यांनी बिनविरोधसह शिवसेना पुरस्कृत पॅनलकडे ३१ ग्रामपंचायती आल्याचा दावा केला आहे. या पॅनलप्रमुख तसेच विजयी उमेदवारांनी आपल्याला तसे कळवल्याचे कापसे यांनी म्हटले आहे. सरपंचपदाच्या निवडीनंतर ३५ ग्रामपंचायती शिवसेनेकडे येतील असेही कापसे यांनी म्हटले आहे.
‘वंचित’कडे ७ ग्रामपंचयती
वंचित बहुजन आघाडीने तालुक्यातील ७ ग्रामपंचायतींवर निर्णायक विजय मिळविल्याचे ‘वंचित’चे तालुकाध्यक्ष राजाभाऊ मळगे यांनी पत्रकान्वये म्हटले आहे. वंचितचे एकूण ८० उमेदवार तालुक्यात निवडून आल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
राष्ट्रवादीला फटका
तालुक्यात स्थानिक निवडणुकीत दरवेळी राष्ट्रवादी व सेना अशी सरळ लढत असते. पण यंदा राष्ट्रवादी महाविकास आघाडीत असल्याने व आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे समर्थकही भाजपवासी झाल्याने तालुक्यात प्रथमच भाजप विरुद्ध सगळे असे एकंदर निवडणुकीचे चित्र दिसले. त्यात भाजप व सेनेला चांगले यश मिळाले, काँग्रेसलाही ४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळविता आले. परंतु, राष्ट्रवादीला आ. पाटील यांच्यानंतर ग्रामीण भागात वर्चस्व मिळविण्यासाठी चांगली तयारी करावी लागणार असल्याचे या निकालावरून दिसून आले.