उमेद स्वयंसाहाय्यता समूहांना बँकांनी अर्थसाह्य करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST2021-08-01T04:29:51+5:302021-08-01T04:29:51+5:30
उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमेद स्वयंसाहाय्यता समूहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे ...

उमेद स्वयंसाहाय्यता समूहांना बँकांनी अर्थसाह्य करावे
उस्मानाबाद : जिल्ह्यातील उमेद स्वयंसाहाय्यता समूहांना उद्योग उभारणीसाठी बँकांनी आर्थिक आणि बौद्धिक मदत करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत येथील जिल्हा परिषदेत जिल्ह्यातील सर्व बँकांच्या जिल्हास्तरीय बँक अधिकाऱ्यांची बैठक गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. या वेळी ते बोलत होते. बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अनिलकुमार नवाळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक नीलेश विजयकर तसेच सर्व बँकांचे जिल्हास्तरीय बँक अधिकारी उपस्थित होते.
या वेळी उमेद अंतर्गत स्वयंसाहाय्यता समूहांना विविध बँकांमार्फत वितरित करण्यात येणाऱ्या बँक कर्ज प्रकरणे आणि प्रलंबित खाते उघडण्याबाबत बँकनिहाय आढावा घेण्यात आला. २०२१-२२ अंतर्गत जिल्ह्यासाठी असणारे कर्जवितरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के साध्य करण्याच्या अनुषंगाने बँकांनी सहकार्य करावे. तसेच स्वयंसाहाय्यता समूह, ग्रामसंघ आणि प्रभागसंघ या समुदाय संस्थांची प्रलंबित बँक खाती त्वरित उघडावीत, असे आवाहन नवाळे यांनी केले.
या वेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे मुख्य प्रबंधक शरद खोले, महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे एकनाथ शिंदे, बँक ऑफ महाराष्ट्रचे सुनील कुमार तसेच इतर बँकांचे जिल्हास्तरीय अधिकारी, उमेद अभियानाचे जिल्हा व्यवस्थापक अमोल सिरसट, समाधान जोगदंड तसेच सर्व तालुक्यांचे तालुका अभियान व्यवस्थापक उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. बालवीर मुंडे यांनी केले तर आभार जिल्हा व्यवस्थापक समाधान जोगदंड यांनी मानले.