मुजीब पठाण यांची नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:29 IST2021-01-18T04:29:59+5:302021-01-18T04:29:59+5:30
ढोकी : रिपब्लिकन सेनेच्या परभणी येथे पार पडलेल्या बैठकीत येथील मुजीब पठाण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ...

मुजीब पठाण यांची नियुक्ती
ढोकी : रिपब्लिकन सेनेच्या परभणी येथे पार पडलेल्या बैठकीत येथील मुजीब पठाण यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष मनोहर डबरासे, प्रदेश महासचिव प्रा. युवराज धासवाडीकर, प्रदेश उपाध्यक्ष विनायक दुधे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य किरण घोंगडे, योगेंद्र चौरे आदी उपस्थित होते.
शेतकरी त्रस्त
पाथरुड : भूम तालुक्यातील पाथरुड परिसरात यंदा परतीचा दमदार पाऊस झाल्यामुळे रबी हंगामातील पिकांची वाढ चांगली आहे; परंतु ज्वारी पिकावर मोठ्या प्रमाणात चिकटा मावा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे ज्वारीसारख्या पिकात फवारणीसह पावडर टाकताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असून, चिकटा मावा रोगाने शेतकरी त्रस्त आहेत.
निकालाकडे लक्ष
पाथरुड : भूम तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या असलेल्या पाथरुड परिसरातील पाथरुडसह आनंदवाडी, सावरगाव, जेजला, तिंत्रज, जांब, बावी, दुधोडी, जयवंतनगर, आदी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान प्रक्रिया पार पडली. याची मतमोजणी सोमवारी होत असून, यात कोण बाजी मारणार याकडे विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
‘रक्तपेढी सुरू करा’
कळंब : शहरात रक्तपेढी सुरू करावी, अशी मागणी बाबा भवर मित्र परिवाराकडून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या निवेदनावर डॉ. ऋषिकेश भवर, अंगद बरगुले, महादेव वनकळस, अजय जाधव, श्रीकांत काटे, अभिजित मुळीक, मनोज शिंदे, आकाश धानवडे, किसन शिंदे, सौरभ मुंडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे
बलसूर : उमरगा तालुक्यातील बलसूर ते रामपूर रस्ता काटेरी झुडपांच्या विळख्यात सापडला आहे. रामपूर ते पेठसांगवी या २३ किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून दोन वर्षांपूर्वी डांबरीकरण झाले आहे; परंतु सद्य:स्थितीत बलसूर ते रामपूर या चार किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपे वाढली आहेत. या मार्गावरून सतत शेतकऱ्यांची तसेच रामपूर येथून बलसूर येथे दैनंदिन कामकाजासाठी ग्रामस्थांची वर्दळ असते. मात्र, या काटेरी झुडपामुळे वाहनचालकांना मोठा त्रास होत असून, यामुळे अपघाताचा धोकाही वाढला आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन धोकादायक काटेरी झुडपे काढावी, अशी मागणी बलसूर परिसरातील संदीप बिराजदार, ज्ञानेश्वर जंगाले, बाबूराव शेके, दगडू मोहळे, आदी शेतकऱ्यांनी केली आहे.