कृषी अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:32 IST2021-03-10T04:32:24+5:302021-03-10T04:32:24+5:30

नळदुर्ग : माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती दिली नाही व त्याकरीता सुनावणी घेतली नसल्याने राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनमाहिती ...

Agriculture officials fined Rs 5,000 | कृषी अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

कृषी अधिकाऱ्यांना पाच हजारांचा दंड

नळदुर्ग : माहितीच्या अधिकाराखाली मागितलेली माहिती दिली नाही व त्याकरीता सुनावणी घेतली नसल्याने राज्य माहिती आयोगाच्या औरंगाबाद खंडपीठाने जनमाहिती अधिकारी तथा तालुका कृषी अधिकारी यांना ५ हजार रुपयाचा दंड ठोठावला. येथील सुहास रामराव येडगे यांनी तुळजापूर तालुका कृषी अधिकारी यांना २०१६ मध्ये माहितीच्या अधिकाराखाली माहिती मागितली होती. दरम्यान, या प्रकरणी जनमाहिती अधिकारी तथा कृषी अधिकारी यांनी वेळेत कार्यवाही केली नाही म्हणून सुहास येडगे यांनी प्रथम अपीलीय अधिकारी तथा जिल्हा कृषी अधिकारी उस्मानाबाद यांच्याकडे अपील केले होते. येथे प्रथम अपीलीय अधिकारी यांनी जनमाहिती अधिकारी यांना कार्यवाहीच्या दिरंगाईबाबत सुचित करुन माहिती देण्याबाबत कळविले होते. परंतु, तरीही कार्यवाही झाली नसल्याने येडगे यांनी राज्य माहिती आयोग, खंडपीठ औरंगाबाद यांच्याकडे याचिका दाखल केली होती. येथे जनमाहिती अधिकाऱ्यांवर ठपका ठेवून ५ हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. तसेच सदर दंड प्रथम अपिलीय अधिकाऱ्यांनी वसूल करुन शासनाच्या विविध लेखा शिर्षाखाली जमा करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोना १९ प्रादुर्भावामुळे १३ मार्च २०२० रोजीचा निर्णय अपिलार्थींना मार्च २०२१ मध्ये मिळाला.

Web Title: Agriculture officials fined Rs 5,000