१२ साखर कारखान्यांकडून ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:32 IST2021-04-17T04:32:39+5:302021-04-17T04:32:39+5:30

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या ...

37,000 metric tons of sugarcane crushed by 12 sugar mills | १२ साखर कारखान्यांकडून ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

१२ साखर कारखान्यांकडून ३७ हजार मेट्रिक टन उसाचे गाळप

उस्मानाबाद : जिल्ह्यातील सहकारी तसेच खासगी साखर कारखान्यांची संख्या जवळपास साेळा एवढी आहे. परंतु, नुकत्याच सरलेल्या गाळप हंगामात अवघ्या बारा कारखान्यांचे धुराडे पेटले. या सर्व कारखान्यांनी मिळून सुमारे ७३ लाख ४२ हजार १९२ मेट्रिक टन उसाचे गाळप केले. ऊसगाळपात कळंब तालुक्यातील रांजनी येथील नॅचरल शुगरने बाजी मारली. या कारखान्याने सर्वाधिक आठ लाख आठ हजार ८६० मे.टन उसाचे गाळप केले, तर पारगाव येथील भीमाशंकर शुगर मिलने केवळ एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले आहे.

एकेकाळी जिल्ह्यातील तेरणा, तुळजाभवानी हे सहकारी साखर कारखाने उसाच्या गाळपात आघाडीवर राहत हाेते. परंतु, मागील काही वर्षात जिल्ह्यात खासगी कारखान्यांचेही माेठ्या प्रमाणात जाळे विस्तारले आहे. सहकार क्षेत्रातील तेरणा, तुळजाभवानी हे दाेन्ही माेठे कारखाने बंद असल्याने सध्या खासगी कारखान्यांची चलती आहे. नुकत्याच सरलेल्या हंगामात खासगी कारखान्यांनीच गाळपात बाजी मारल्याचे दिसून येते. जिल्ह्यात खासगी आणि सहकारी मिळून जवळपास साेळा कारखाने आहेत. यापैकी तेरणा, श्री तुळजाभवानी, नृसिंह आणि नितळी येथील जयलक्ष्मी हे चार कारखाने बंद राहिले. उर्वरित बारा कारखान्यांनी मात्र उसाचे गाळप केले. यामध्ये प्रतिदिन पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या रांजनी येथील नॅचर शुगरने तब्बल आठ लाख आठ हजार ८६० मेट्रिक टन उसाचे गाळप करून अव्वल क्रमांक पटकाविला. यानंतर लाेहारा तालुक्यातील खेड येथील सर्वाधिक सहा हजार मेट्रिक टन गाळप क्षमता असलेल्या ‘लाेकमंगल’ने चार लाख ८४ हजार २२४ मे. टन उसाचे गाळप करून द्वितीय क्रमांक पटकाविला. तिसऱ्या क्रमांकावर भैरवनाथ शुगर हा कारखाना आहे. साडेतीन हजार मे. टन गाळप क्षमता असणाऱ्या या कारखान्याने तीन लाख ६४ हजार ४६८ मे.टन. गाळप केले आहे. मुरूम येथील ‘विठ्ठलसाई’ने तीन लाख २८ हजार ७७८, डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखान्याने तीन लाख तीन हजार ७७६, वाशी येथील शिवशक्ती शेतकरी सहकारी साखर कारखान्याने दाेन लाख २८ हजार १५८, भाऊसाहेब बिराजदार कारखान्याने दाेन लाख ४० हजार ७६९, बाणगंगा कारखान्याने दोन लाख ८८ हजार ६८६, ‘डीडीएन’ने दोन लाख ४८ हजार २७५, धाराशिव शुगरने तीन लाख ३२ हजार ७९०, कंचेश्वर शुगरने तीन लाख ३१ हजार ४२५ आणि भीमाशंकर शुगरने सर्वात कमी एक लाख २४ हजार ३९९ मे. टन उसाचे गाळप केले. यापैकी चार कारखान्यांचा हंगाम फेब्रुवारीमध्येच गुंडाळला गेला, तर उर्वरित आठ कारखान्यांचा हंगाम मार्चमध्ये आटाेपला. बंद असलेले कारखाने पुढील हंगामात सुरू झाल्यास हे चित्र आणखी बदलेल.

चाैकट...

साखर उताऱ्यात दाेन कारखाने पुढे...

उसाचे सर्वाधिक गाळप करण्यात ‘नॅचरल’ने बाजी मारली असली तरी साखर उताऱ्यात डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सहकारी साखर कारखाना व कंचेश्वर शुगरने बाजी मारली आहे. दाेन्ही कारखान्याला प्रत्येकी १०.५५ टक्के उतारा मिळाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर विठ्ठलसाई साखर कारखाना आहे. १०.२२ टक्के एवढा उतारा आहे. तसऱ्या क्रमांकावर नॅचर शुगर कारखाना आहे. ९.६१ टक्के एवढा उतारा मिळाला आहे. शिवशक्तीला ९.३४ टक्के, भाऊसाहेब बिराजदार ९.३०, बाणगंगा ८.७२, डीडीएन ८.५४, भीमाशंकर ९.३९, धाराशिव ९.४९, भैरवनाथ ९.१० तर ‘लाेकमंगल’चा साखर उतारा केवळ ७.९२ टक्के आला आहे.

३८ लाख क्विंटल साखर उत्पादित...

जिल्ह्यातील साेळा पैकी बारा कारखान्यांनी उसाचे गाळप केले. या सर्व कारखान्यांनी मिळून संपूर्ण गाळप हंगामात ३८ लाख ५९ हजार ८४३ क्विंटल साखर उत्पादित केली आहे. नॅचरल शुगरने सर्वाधिक सात लाख ७७ हजार ३५० क्विंटल साखर उत्पादन केल्याचे प्राप्त आकडेवारीवरून समाेर आले आहे.

Web Title: 37,000 metric tons of sugarcane crushed by 12 sugar mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.