ओडिशाच्या गंजम जिल्ह्यात एका महिलेने तिच्या दोन मुलांना विष देऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृतांमध्ये २० वर्षांची मुलगी, २३ वर्षांचा मुलगा आणि त्यांच्या आईचा समावेश आहे. कौटुंबिक वादातून तिघांनीही विषप्राशन केलं, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर तिघांनाही तातडीने बेरहमपूर येथील एमकेसीजी मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
एका नातेवाईकाने दिलेल्या माहितीनुसार, "मी घरी पोहोचलो तेव्हा त्यांना उलट्या होत होत्या. त्यांना ताबडतोब स्थानिक मेडिकलमध्ये नेण्यात आलं आणि नंतर एमकेसीजी मेडिकलमध्ये दाखल करण्यात आलं. सर्वात आधी आईचा मृत्यू झाला, नंतर मुलगा आणि शेवटी मुलीचाही मृत्यू झाला. त्याचं कोणाशीही वैर नव्हतं, परंतु प्रत्यक्षात काय घडलं हे माहित नाही."
गंजम पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, "आम्हाला स्थानिकांकडून घटनेची माहिती मिळाली, त्यानंतर आम्ही घटनास्थळी पोहोचलो. प्राथमिक तपासात कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी विषप्राशन केल्याचा संशय आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच परिस्थिती पूर्णपणे स्पष्ट होईल. आम्ही प्रत्येक बाजूने तपास करत आहोत."
कौटुंबिक आयुष्यात समस्या असल्याने आईने मुलांसह टोकाचं पाऊल उचलल्याचं म्हटलं जात आहे. आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचं आश्वासन पोलिसांनी दिले आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.