लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : तालुक्यातील ग्राम दासगाव बुज येथील भारती सुरेंद्र सहारे (४४, रा. दासगाव बुज) यांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याने मुलानेच गळा दाबून व डोके जमिनीवर आपटून आईचा जीव घेतला. प्रकरणी तिच्या १७ वर्षीय मुलावर सोमवारी (दि.३०) खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारती सहारे आपल्या १७ वर्षीय मुलासोबत राहत होती. पतीच्या निधनानंतर गावातच नड्डे व अंडी विकून आपला उदरनिर्वाह करायची. भारतीला तिचा मुलगा नेहमीच खर्चासाठी पैसे मागत होता. असेच पैसे मागण्यावरून गुरुवारी (दि.२६) रात्री दोन्ही मायलेकांत वाद झाला. या वादात मुलाने भारतीचा गळा आवळून डोके जमिनीवर आपटले, यामुळे डोक्यात अंतर्गत रक्तस्त्राव झाला व मेंदूत रक्त गोठून तिचा मृत्यू झाला. मेंदूत रक्तस्त्राव झाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांनी दिला आहे.
व्हिसेरा तपासणीसाठी नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालात मृत्यूस डोक्यातील रक्तस्राव कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मृत्यू नैसर्गिक नसून मारहाणीमुळे झाल्याचे स्पष्ट झाले. या घटनेसंदर्भात रावणवाडी पोलिसांनी १७ वर्षीय विधी संघर्षीत मुलावर भारतीय न्याय संहिता कलम १०३ (१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
मृत्यू लपविण्याचा प्रयत्नभारतीच्या मृत्यूनंतर आरोपी मुलाने तिचा मृत्यू आजारपणाने झाला असल्याचे भासवून नातेवाईकांना फोन केला. शुक्रवारी (दि.२७) तातडीने गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कारही करण्यात आले. नातेवाईकांची दिशाभूल करत मुलाने आईचा अंत्यसंस्कार केला. मृत्यू संशयास्पद वाटल्याने ग्राम हिवरा येथील पोलिस पाटील विनोद ईस्तारू नंदेश्वर (४५) यांनी शनिवारी (दि.२८) रावणवाडी पोलिसात तक्रार केली. त्यांच्या मोठ्या वडिलांची मुलगी भारती शहारे हिला तिच्या मुलाने मारून नातेवाईकांची दिशाभूल केली होती.