Raja Raghuvanshi Case : इंदूरच्या राजा रघुवंशी याच्या मेघालयमध्ये झालेल्या हत्येला जवळजवळ २० दिवस उलटले तरी, या प्रकरणाचे गूढ अजूनही कायम आहे. पोलिसांनी राजाची पत्नी सोनम आणि तिचा कथित प्रियकर राज यांच्यासह पाच आरोपींना अटक केली असली तरी, या भीषण हत्येचा खरा सूत्रधार कोण, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. राजाला कायमचे संपवण्याचा पहिला विचार कोणाच्या मनात आला, हा प्रश्न अनुत्तरित आहे.
सोनम आणि राज हे दोघेही हत्येचे सूत्रधार म्हणून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत आहेत. राजचे म्हणणे आहे की, हा सर्व सोनमच्या डोक्यातील कट होता. तो स्वतः मेघालयला गेला नव्हता आणि कंत्राटी मारेकऱ्यांनीही सुरुवातीला खून करण्यास नकार दिला होता. मात्र, सोनमने त्यांना १५ लाख रुपयांचे आमिष दाखवून हे कृत्य करण्यास भाग पाडले, असा राजचा दावा आहे.
'ऑपरेशन हनिमून' आणि गुंतागुंतीचा तपासराज आणि सोनम यांच्यातील या आरोप-प्रत्यारोपामुळे मेघालय पोलिसांच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) मोठा पेच निर्माण झाला आहे. आरोपींचे जबाब, उपलब्ध पुरावे आणि घटनाक्रम यांची सांगड घालून पोलीस प्रत्येक धागा उलगडण्याचा प्रयत्न करत आहेत. 'ऑपरेशन हनिमून' या मोहिमेअंतर्गत, एसआयटीने मेघालयसोबतच इंदूर आणि गाझीपूर येथूनही महत्त्वपूर्ण पुरावे गोळा केले आहेत. राज, राजा आणि सोनम हे इंदूरचे रहिवासी आहेत, तर हत्येतील अन्य आरोपींना उत्तर प्रदेशातील गाझीपूरमधून अटक करण्यात आली आहे.
राजचे धक्कादायक दावेपोलिसांच्या चौकशीदरम्यान, राज कुशवाहाने दावा केला आहे की त्याने शेवटच्या क्षणी मेघालयला जाण्यास नकार दिला होता आणि इतरांनाही तिथे जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता. हिंदुस्तान टाईम्सने एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, "राज कुशवाहाने दावा केला की, तो सोनमला पाठिंबा देऊ इच्छित नव्हता आणि शेवटच्या क्षणी मेघालयला जाण्याचा बेत रद्द केला. त्याने इतरांनाही तिथे जाण्यापासून रोखले होते, परंतु सोनमने तिकिटे बुक केल्यानंतर ते मेघालय पाहण्यासाठी गेले."
अधिकाऱ्याने पुढे सांगितले की, "राज म्हणतो की, शेवटच्या क्षणी इतर आरोपींनीही राजाला मारण्यास नकार दिला, परंतु सोनमने तसे करण्याचा आग्रह धरला आणि १५ लाख रुपये देऊन त्यांना राजी केले." पोलीस राजच्या या दाव्यांची कसून पडताळणी करत आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कंत्राटी मारेकरी अयशस्वी ठरले असते, तर सोनम स्वतः राजाला डोंगरावरून ढकलून मारण्यास तयार होती, असेही म्हटले जात आहे.
हनिमूनचा शेवट रक्तरंजितराजा आणि सोनमचे ११ मे रोजी लग्न झाले होते. २० जून रोजी ते दोघे हनिमूनसाठी निघाले. गुवाहाटीतील कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर ते शिलाँगला गेले. तिथे अचानक ते दोघे बेपत्ता झाले. जवळपास १० दिवसांनी, २ जून रोजी राजाचा मृतदेह एका खड्ड्यात सापडला. धारदार शस्त्राने त्याची हत्या करून मृतदेह फेकण्यात आल्याचे समोर आले. आतापर्यंतच्या तपासात, सोनमने तिचा कथित प्रियकर राज आणि त्याच्या तीन मित्रांसह राजाची हत्या केल्याचे दिसून आले आहे. तथापि, तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, ज्याच्यासाठी राजाची हत्या करण्यात आली होती, त्या व्यक्तीचे नावही समोर येऊ शकते. सोनमने राजाचा केवळ मोहरा म्हणून उपयोग केला असण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.