एक अयशस्वी प्रेम कहाणी या थराला जाऊ शकते ज्याचा कुणी विचारही केला नसेल. त्याचेच ताजे उदाहरण म्हणजे चेन्नईतून समोर आले आहे. एका युवतीने सहकाऱ्याला अडचणीत आणण्यासाठी असं सायबर जाळे टाकले ज्यामुळे देशातील सुरक्षा यंत्रणाही हैराण झाली. रेने जोशिल्दा असं या युवतीचे नाव असून ती एक रोबोटिक्स एक्सपर्ट आहे. एका नामांकित कंपनीत ती कामाला आहे. एकतर्फी प्रेमातून तिने तिचा सहकारी दिविज प्रभाकर याला जेलमध्ये पोहचवण्याचं षडयंत्र रचले. तिने दिविजच्या नावाने बनावट ईमेल आयडी बनवून देशातील १२ राज्यातील पोलिसांना २१ पेक्षा अधिक बॉम्बची धमकी असणारे ईमेल पाठवले.
पोलिस तपासात समोर आले की, रेने दिविजवर प्रेम करत होती परंतु फेब्रुवारी २०२५ रोजी दिविजने लग्न केले. त्यामुळे रेनेला प्रचंड राग आला. तिने दिविजला धडा शिकवायचा असा चंग बांधला. त्यामुळे रेनेने बनावट आयडी वापरून दिविजला दहशतवादी कृत्यामध्ये अडकवण्याचे प्लॅनिंग केले. रेनेने तिच्या तंत्रज्ञानाच्या माहितीचा गैरवापर करत डार्क वेब आणि व्हर्चुअल प्रायव्हेट नेटवर्कचा आधार घेत बनावट ओळख बनवली. फेक आयडीच्या माध्यमातून तिने दिल्ली, पंजाब, बिहार, गुजरात आणि अन्य राज्यांना टार्गेट केले. अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडिएमवर आयपीएल २०२५ चा अंतिम सामना होणार होता. या सामन्याआधी प्रशासनाला या स्टेडिअमला बॉम्बने उडवण्याची धमकी देणारा ईमेल आला त्यामुळे सुरक्षा यंत्रणेत खळबळ माजली.
इतकेच नाही तर ज्या अहमदाबादच्या विमान दुर्घटनेमुळे संपूर्ण देशात हळहळ व्यक्त करण्यात आली. या अपघातात २७० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. त्या अपघातानंतर या घटनेला दहशतवादी कारवायाशी जोडण्याचा प्रयत्न रेनेने केला. ज्या इमारतीला हे विमान धडकले त्या बीजे मेडिकल कॉलेजला रेने हिने धमकीचा ईमेल पाठवला. हे विमान इमारतीला धडकवण्यामागे दहशतवादी षडयंत्र होते, ते दिविशने रचले आहे असं दाखवण्याचा तिचा डाव होता हे देखील रेने जोशिल्दाच्या तपासातून उघड झाले आहे.
कसा झाला पर्दाफाश?
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. त्यावेळी रेनेने प्रत्येक कृत्यातून तिला वाचवण्याचा, स्वत:ची ओळख लपवण्याचा प्रयत्न केला होता परंतु सायबर फॉरेन्सिक आणि तंत्रज्ञान एक्सपर्टकडून मदत घेत पोलिसांनी अखेर रेने जिशोल्दाला अटक केली. तिच्या तपासातून अनेक धक्कादायक खुलासे समोर आले. केवळ दिविजला त्रास देणे, त्याला जेलला पाठवणे या हेतूने रेनेने हे संपूर्ण षडयंत्र रचले होते. मात्र तिच्या कृत्यातून सर्वसामान्यांमध्ये दहशत पसरली आणि सुरक्षा यंत्रणाही त्रस्त झाल्या.