उत्तर प्रदेशातील बस्ती जिल्ह्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. एक तरुण आपल्या आई आणि पत्नीमधील सततच्या भांडणांमुळे इतका त्रस्त झाला होता की, त्याने अखेरीस आत्महत्येचा मार्ग पत्करला. बुधवारी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास त्याने आपल्या घरात गळफास घेऊन जीवन संपवले. ही घटना ऐकून-बघून प्रत्येकजण हादरला आहे.
सदरची घटना बस्ती जिल्ह्यातील हरैया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महादेवरी येथील आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. प्राथमिक तपासात कौटुंबिक कलहामुळेच तरुणाने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर येत आहे.
महादेवरी येथील रहिवासी असलेल्या विकास गौड (२५) याने बुधवारी सकाळी घरातील छताला असलेल्या पंख्याला साडीचा फास लावून गळफास घेतला. कुटुंबीयांनी त्याला पाहिल्यानंतर आरडाओरडा केला. आजूबाजूचे लोक जमा झाले आणि त्याला तातडीने फासावरून उतरवून हरैया येथील सामुदायिक आरोग्य केंद्रात (सीएचसी) नेण्यात आले. मात्र, तिथे पोहोचताच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
कौटुंबिक कलह ठरला कारणीभूतपोलिसांच्या चौकशीत कुटुंबीयांनी सांगितले की, विकासची पत्नी खुशबू आणि त्याची आई आरती यांच्यात नेहमीच कौटुंबिक कलह होता. बुधवारी सकाळीही सासू-सुनेत जोरदार भांडण झाले होते. या भांडणांना कंटाळूनच विकासने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच हरैयाचे प्रभारी निरीक्षक तहसीलदार सिंह यांनी घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.