कुशीनगर - उत्तर प्रदेशच्या कुशीनगर जिल्ह्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. याठिकाणी सुकरौली येथील मझना नाल्यात ६ जून रोजी जबलपूरच्या युवकाची हत्या करून त्याचा मृतदेह फेकण्यात आला होता. या प्रकरणी रविवारी पोलिसांनी खुलासा केला. या हत्या प्रकरणी एका महिलेसह तिघांना पोलिसांनी अटक केली. यांना पुराव्यासह कोर्टात हजर करून पोलीस कोठडीत पाठवले आहे. बनावट लग्न करून युवकाची संपत्ती हडप करण्याचा हा प्लॅन असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याबाबत एसपी संतोष कुमार मिश्रा म्हणाले की, सुकरौली येथे सापडलेल्या मृतदेहाची ओळख आणि संपूर्ण घटनेचा तपास करण्यासाठी पोलिसांची ३ पथके बनवली होती. मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी विविध अँगलने चौकशी केली गेली. त्यानंतर हा मृतदेह मध्य प्रदेशातील जबलपूर येथील युवक इंद्रकुमार तिवारी याचा असल्याचे समोर आले. मृतदेहाची ओळख त्याच्या कुटुंबाने पटवली. हा युवक बेपत्ता झाल्याची तक्रारही स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून युवकाचे आधार कार्ड, लग्नात वापरलेले दागिने, रोकड आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्या.
पोलिसांच्या चौकशीत आरोपी महिला खुशी तिवारी हिने तिचे खरे नाव साहिबा बानो असल्याचं सांगितले. काही दिवसांआधीच सोशल मीडियावर तिची ओळख देवरिया जिल्ह्यात राहणाऱ्या कौशल गौंडसोबत झाली होती. सुरुवातीला या दोघांची ओळख झाली. त्यानंतर दोघांनी लग्न केले. गोरखपूर येथे भाड्याने खोली घेऊन ते राहत होते. त्यातच एकेदिवशी दोघांनी सोशल मीडियावर इंद्रकुमार तिवारी याचा व्हायरल व्हिडिओ पाहिला. या व्हिडिओत तो १८ एकर जमीन असूनही माझे लग्न होत नसल्याचे सांगितले. ही कहाणी ऐकून साहिबा आणि कौशलने एक प्लॅन बनवला. त्यानुसार इंद्रकुमारसोबत बनावट लग्न करून त्याची संपत्ती हडप करण्याचा डाव दोघांनी आखला.
इंद्रकुमारला भेटायला कौशल जबलपूरला गेला
प्लॅनिंगनुसार, कौशल इंद्रकुमारला भेटायला मध्य प्रदेशातील जबलपूर येथे गेला. तिने त्याने साहिबा बानो हिची ओळख खुशी तिवारी म्हणून केली. साहिबाला स्वत:ची बहीण सांगून त्याने इंद्रकुमारसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर काही दिवस साहिबा बानो खुशी तिवारी म्हणून इंद्रकुमारशी फोनवर बोलू लागली. त्यानंतर लग्नासाठी त्याला गोरखपूरला बोलावले. ३ जून रोजी इंद्रकुमार गोरखपूरला आला. तिथे प्लॅनिंगनुसार साहिबा बानो आणि कौशल कुमार याने इंद्रकुमारच्या संपत्तीबाबत प्रतिज्ञापत्र बनवले. त्यानंतर कौशल आणि समसुद्दीन यांच्या मदतीने साहिबाने इंद्रकुमारची हत्या करण्याचे ठरवले. ५ जून रोजी लग्नाचे खोटे नाटक करून साहिबा बानो आणि इंद्रकुमारचे लग्न लावले.
मधुचंद्राची ती रात्र....
लग्नानंतर इंद्रकुमार तिवारीला पनीर राईसमध्ये झोपेच्या गोळ्या घालून खायला दिले. त्यानंतर काही वेळाने इंद्रकुमार बेशुद्ध झाला. या तिघांनी इंद्रकुमारला कारमध्ये बसवून सुकरौलीला नेले. तिथे बेशुद्ध अवस्थेत असलेल्या इंद्रकुमारची चाकू भोसकून हत्या करण्यात आली आणि त्याचा मृतदेह झुडपात टाकून दिला. पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे.