उत्तर प्रदेशमधील प्रयागराजमध्ये महाकुंभ सुरू आहे. जगभरातून लाखो भाविकांनी गर्दी केली आहे. काही दिवसापूर्वी झारखंडमधून एक प्रेमी युगल प्रयागराजमध्ये आले होते. यादरम्यान, प्रियकराने वाटेतच प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आधी त्याने त्याच्या प्रेयसीचा गळा दाबला आणि नंतर चाकूने तिचा गळा चिरून तिची निर्घृण हत्या केली.
या घटनेनंतर तो प्रियकर कुंभमेळ्याला गेला आणि स्नान करून घरी परतला. त्याला वाटले होते की कुंभमेळ्यात स्नान केल्यानंतर त्याचे पाप धुऊन जाईल.
५ फेब्रुवारी २०२५ रोजी, झारखंडमधील घाघरा येथील रहिवासी सोनू कुमार त्याची मैत्रीण अनुरिका कुमारीला बाईकवरून महाकुंभाला घेऊन जात होता. देहरीमध्ये, मुलीला वॉशरूमला जायचे होते, त्यानंतर प्रियकराने एका निर्जन ठिकाणी बाईक पार्क केली आणि प्रेयसीला रस्त्याच्या कडेला असलेल्या झुडुपांकडे घेऊन गेला.यानंतर त्याने आपल्या प्रेयसीचा स्कार्फने गळा दाबला आणि चाकूने तिचा गळा चिरला. यानंतर तो महाकुंभात पोहोचला आणि स्नान करून घरी परतला.
दुसरीकडे तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणी अजूनही घरी आली नाही म्हणून शोध सुरू केला. तेव्हा अनुरिकाच्या आईने बिसुनपूर पोलीस ठाण्यात माहिती दिली. यावेळी आईने मुलगी मित्रासोबत कुंभमेळ्याला गेली आहे, पण अजून परतलेली नाही, असं सांगितलं. हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचताच, सोनूला चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावण्यात आले, तिथे चौकशीदरम्यान त्याने सर्व घटनाक्रम सांगून हत्या केल्याचे कबुल केले.
आरोपीने सांगितलेली माहिती मिळताच बिहार पोलीस बिशुनपूरला पोहोचले आणि आरोपींना सोबत घेतले. दरम्यान, मृताचे नातेवाईक मृतदेह आणण्यासाठी देहरीला रवाना झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, अनुरिका आणि सोनू कुमार यांचे दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. अनुरिका सोनूवर लग्नासाठी दबाव आणत होती. सोनूला लग्न करायचे नव्हते. मुलीने गुमला महिला पोलीस स्टेशन आणि बिष्णुपूर पोलीस स्टेशनला लेखी माहितीही दिली होती.
पार्सल देत असताना झाली होती ओळख
सोनू कुमारने सांगितले की, तो कुरियर बॉय म्हणून काम करतो. एप्रिल २०२३ मध्ये, तो अनुरिकाचे ऑनलाइन पार्सल डिलिव्हरी करण्यासाठी गेलो होता. यावेळी ते एकमेकांना भेटले. यानंतर फोनवरही संभाषण सुरू झाले. यानंतर दोघांचे प्रेमसंबंध सुरू झाले.