मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. मुलीच्या साखरपुड्याच्या आधी वडिलांना मृत्यूने गाठलं. वडिलांच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंब हादरलं. भाजी खरेदी करण्यासाठी बाहेर पडलेल्या वडिलांना २० सेकंदात एकामागून एक तीन ट्रकने चिरडलं. भीषण अपघातात त्यांचा मृत्यू झाला. जनकगंज पोलीस स्टेशन परिसरातील रामद्वारा परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, नवग्रह कॉलनीतील रहिवासी देवेंद्र जाटव भाजी खरेदी करण्यासाठी घराबाहेर पडले होते. रात्री परिसरातील हॉटेल्स बंद असताना देवेंद्र थोडे पुढे गेले. रात्री २ वाजता रस्त्याच्या कडेला ते चालत असताना एका ट्रकने त्यांना जोरदार धडक दिली. ज्यामुळे ते रस्त्यावर पडले. यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या ट्रकनेही त्यांना चिरडलं.
पोलिसांनी सांगितलं, अपघातात देवेंद्र हे गंभीर जखमी झाले. त्याच्या डोक्याला खोल जखमा होत्या. घटनास्थळी पोहोचलेला त्यांचा धाकटा भाऊ गजेंद्र याने त्यांना उपचारासाठी तातडीने ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. मात्र याच दरम्यान त्यांचा मृत्यू झाला .
देवेंद्र यांना तीन मुलं आहेत. घरामध्ये मोठ्या मुलीच्या साखरपुड्याची, लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. १५ जुलै रोजी कुटुंबीय मुलाच्या घरी जाणार होते. पण अपघात झाल्याने हसतं खेळतं खेळ घर उद्ध्वस्त झालं आहे. या घटनेने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.