- किरण शिंदे
सध्या पुणे आणि परिसरात चांगला पाऊस झाला आहे. यामुळे राजभरातूनच नाही तर देशभरातून पुण्यात कामधंद्यानिमित्त, शिक्षणासाठी आलेली तरुणाई पानशेत, खडकवासला, लोणावळा अशा ठिकाणी फिरायला निघत आहे. परभणीच्या पुण्यात राहणाऱ्या पाच मित्रांनाही या आल्हाददायक वातावरणात पानशेतला जाण्याची आणि तिथे सिगारेट ओढण्याची तलफ आली होती. त्यांना तेथील स्थानिकाने हटकताच या तरुणांनी त्यालाच मारहाण करत ठार केल्याची घटना घडली आहे.
वेल्हा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील पानशेत परिसरात ही घटना घडली आहे. स्थानिकाचा खून करून हे पाचही जण पसार झाले होते. पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या पथकाने या पाचही जणांना बेड्या ठोकल्या आहेत.
रोहिदास काळूराम काटकर (वय २४, रा. कादवे, ता वेल्हे,पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पोलिसांनी याप्रकरणी आकाश सुभाष भिसे (वय २१), भागवत मुंजाजी आसुरी (वय २०) रितेश उत्तम जोगदंड (वय १९), रमेश उर्फ भैय्या रामभाऊ शेळके (वय २१) आणि पांडुरंग भानुदास सोनवणे (वय १९) यांना अटक केली आहे. मुळचे परभणीचे असलेले हे तरुण पुण्यातील नरे परिसरात राहतात.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की, १५ जून रोजी हे सर्व तरुण पानशेत परिसरात पर्यटनासाठी गेले होते. पानशेत येथील नंदाबाई कुंभार यांच्या हॉटेल समोर यातील काही तरुण सिगारेट ओढत होते. स्थानिक नागरिक असलेल्या रोहिदास काटकर यांनी या तरुणांना हटकले. यावरून त्यांच्यात बाचाबाची झाली. सर्वांनी मिळून त्याला मारहाण केली आणि एकाने तर त्याच्या छातीवर दगड मारला. यामध्ये रोहिदासचा जागीच मृत्यू झाला होता. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर ग्रामीण पोलिसांनी सीसीटीव्हीच्या मदतीने तपासाला सुरुवात केली आणि यातील सर्व आरोपींना अटक केली. ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि वेल्हा पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी केली.