म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते (भाग १)
By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:24+5:302015-01-31T00:34:24+5:30
- महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र

म. गांधीजी बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे होते (भाग १)
- हाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे गांधीजींची पुण्यतिथी : प्रार्थनासभा आणि चर्चासत्र नागपूर : महात्मा गांधी यांचे नाव घेतल्यावर आपल्यासमोर फक्त या देशाचे राष्ट्रपिता आणि खादीचा प्रसार करणारे, स्वदेशी आंदोलन उभारणारे राष्ट्रभक्त अशीच काहीशी प्रतिमा निर्माण होते. त्यात काहीही गैर नाहीच पण यापलिकडेही गांधींजींचे व्यक्तिमत्त्व फारच समृद्ध होते. त्यांच्या संपर्कात आलेल्यांनाच ते माहीत आहे. त्यावर फारसे लिहिले गेले नाही आणि त्याची चर्चाही झाली नाही. देशाच्या संदर्भात महत्त्वाचे निर्णय घेणारा हा नेता बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा धनी होता. कलांवर प्रेम करणारे, रागसंगीताचे ज्ञान असणारे, अध्यात्माची ताकद असणारे आणि तरीही मिश्किल, विनोदी स्वभावाचे गांधीजी होते, अशी आठवण त्यांच्यासह प्रत्यक्ष काम केलेले स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय बरगी गुरुजी यांनी सांगितली. महाराष्ट्र गांधी स्मारक निधीतर्फे कस्तुरबा भवन, बजाजनगर येथे महात्मा गांधी यांच्या पुण्यस्मरणानिमित्त प्रार्थनासभा आणि बंधूता विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी गांधींजींच्या अनेक आठवणी बरगे गुरुजी यांनी सांगितल्या. गांधींजींच्या व्यक्तिमत्त्वाचे हे नवे पैलू नव्या पिढीसाठी नवीन होते. त्यामुळे या कार्यक्रमात कुतूहल निर्माण झाले. याप्रसंगी कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून म्यूर मेमोरिअल हॉस्पिटलचे संचालक विलास शेंडे, कोळसा कामगार नेते माजी आ. एस. क्यू. जामा, सर्वोदयी विचारवंत प्राचार्य आत्माराम उखळकर, गांधी स्मारक निधीचे सचिव सुनील पाटील उपस्थित होते. गांधीजी रोज प्रार्थनासभा घेत आणि त्यानंतर उपस्थितांशी चिंतनपर संवाद करीत. यातूनच देशाच्या अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी शोधली. त्यांच्या प्रार्थनासभेत बरगी गुरुजींचा सातत्याने सहभाग राहिला आहे. यावेळी बरगी गुरुजी म्हणाले, गांधीजींशी प्रत्यक्ष संपर्क आलेले लोक आज फार कमी आहेत. पण मला त्यांना जवळून अनुभवता आले. त्यांच्यातील द्रष्टा नेता आणि राष्ट्रभक्त आपल्याला माहीत आहे. पण प्रार्थनासभेनंतर गांधीजी आपल्या अनुयायांशी विविध प्रश्नांवर चर्चा करीत होते. एकदा गांधीजी आणि कस्तुरबा यांचा सत्कार समारंभ त्यांच्या अनुयायांनी आयोजित केला होता. सारेच गांधीजींना बापू म्हणायचे. बापूंच्या सत्कारानंतर कस्तुरबा यांचा सत्कार केला गेला. त्यावेळी बापू म्हणाले, बापू मध्ये बा आहेच मग पुन्हा तिचा सत्कार कशाला करता, त्यावेळी हसे पिकले होते. अनेकदा फार गंभीर विषय बापू विनोदातून सोडवायचे. असे अनेक किस्से यावेळी त्यांनी सांगितले.