औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळाची दाहकता वाढत आहे़ पाणीटंचाईमुळे मजुरांना शेतावर काम मिळत नसल्यामुळे ते रोजगार हमी योजनेच्या कामांकडे वळत आहेत. या महिन्यात मजूर संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ६,७४४ कामांवर १ लाख ३ हजार ६९ मजूर होते, तर तिसऱ्या आठवड्यात मजुरांच्या संख्येत तब्बल ६२,४०८ ने वाढ झालेली आहे़ एकूण ९,१०४ कामांवर १ लाख ६५ हजार ४७७ मजूर आहेत़मजुराला प्रतिदिन १९१ रुपये मजुरी मिळत असून, मराठवाडा विभागात नोंदणीकृत मजूर कुटुंब संख्या २१ लाख २५ हजार २७९ आहे. मजूर संख्या ५४ लाख ३० हजार ८४९ इतकी आहे़ यातील २० लाख २७ हजार २६७ मजुरांना जॉबकार्ड दिले आहेत. मध्यंतरीच्या काळात रोहयोच्या कामांवर असलेल्या मजुरांची संख्या झपाट्याने कमी झाली होती़ जिल्हाधिकाऱ्यांनी या योजनेचा तालुकानिहाय आढावा घेऊन रोहयो कामे मोठ्या प्रमाणात हाती घ्यावी आणि मागेल त्याला काम उपलब्ध करून द्या, अशा सूचना विभागीय प्रशासनाने दिल्या़ सद्य:स्थितीत सर्वाधिक मजूर हे बीड जिल्ह्यात आहेत़ १९४८ कामांवर ४९ हजार ८४१ मजूर आहेत़ त्याखालोखाल मजुरांची संख्या लातूर, जालना जिल्ह्यांत आहे.औरंगाबाद जिल्ह्यात औद्योगिक वसाहतींमध्ये रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने आणि मजुरीही चांगली मिळत असल्याने बहुसंख्य बेरोजगार औरंगाबादमध्येच काम करीत आहेत़ त्यामुळे मराठवाड्यात रोहयोच्या कामांवर सर्वात कमी मजूर औरंगाबाद जिल्ह्यात आहेत. ती संख्या केवळ ७,७५४ इतकी आहे़ ग्रामपंचायत स्तरावरून मागणीच येत नसल्याचा सूर औरंगाबाद जिल्हा प्रशासनाने आळविला. ग्रामपंचायत स्तरावर आठ जिल्ह्यांत ८,८८२ कामे सुरू असून, यावर १,३९,२६९ मजूर कार्यरत आहेत़ तर यंत्रणेच्या १,३३२ कामांवर २६,२०८ असे एकूण १,६५,४७७ मजूर सध्या ९,१०४ कामांवर काम करीत आहेत़
रोहयोतील मजूर वाढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2016 00:19 IST