हिंगोली : भारनियमनाचा आलेख घटण्याऐवजी वाढतच गेल्याने जिल्हा महावितरणवर नामुष्की ओढवली गेली आहे. जिल्ह्यात एकूण ६७ पैकी केवळ २ फीडर ‘अ’ गटात राहिल्याने गतवर्षीपेक्षा यंदा ‘परफॉरमन्स’ घसरला. गतवर्षी एकही फीडर नसलेल्या ‘जी’ गटात यंदा १२ फीडर पोहचल्याने जिल्हा भारयनिमनमुक्त होण्याऐवजी अंधाराचे साम्राज्य वाढले. जिल्ह्यातील भारनियमन जवळपास १० तासांपर्यंत पोहोचले आहे. संपूर्ण भारनियमनमुक्तची घोषणा राज्य सरकारने केली होती. आज त्याला वर्षाचा कालावधी लोटला तरी भारनियमनात उल्लेखनीय फरक पडलेला नाही. उलट हिंगोली जिल्ह्याची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनताना दिसते. घटती वसुली आणि वाढलेल्या वीज गळतीमुळे फिडरच्या ग्रुपचा आलेख खाली घसरला आहे. परिणामी गतवर्षी मार्च महिन्यात अ ते ड गटात असलेले ५० वरून ३० वर फीडर घसरले. प्रामुख्याने ‘अ’ गटात हिंगोली उपविभागातील एकही फिडर नसून कळमनुरी आणि सेनगाव विभागाने बाजी मारली आहे. उर्वरित बी मध्ये १४ वरून ६, सी- १३ वरून ९ आणि डी- २१ वरून १३ फीडर कोसळले. शून्य भारनियमन असलेल्या वरील चारही गटांप्रमाणे ई आणि एफ गटाची अवस्था सारखीच झाली. पाच तासांचे भारनियमन असलेल्या ई गटात १४ वरून ११ वर फीडर आले. ई मध्ये कमी झालेल्या तीन फिडरमुळे एफ गटाला हातभार लागल्याने ३ वरून ६ वर संख्या गेली. परिणामी हिंगोली आणि सेनगाव उपविभागात गतवर्षी एकही फीडर नसणार्या एफ गटात आजघडीला अनुक्रमे ३ आणि २ फीडर आले. दुसरीकडे औंढा विभागात ६ वरून ३ आणि कळमनुरीत ४ वरून १ फीडर एफ गटात राहिले आहेत. घसरणीचा क्रम जी गटातही कायम राहिल्याने त्याचा सर्वाधिक फटका ग्रामीण भागात बसला. कारण जी गटात प्रचंड भारनियमन असल्याने सध्या ग्रामस्थांना रात्र अंधारात काढावी लागते. गतवर्षी एकही फीडर जी गटात नसल्याने मराठवाड्यात हिंगोली जिल्हा नवाजला होता; परंतु यंदा जी-१, जी-२, जी-३ मिळून तब्बल १२ फीडर जी गटात आल्याने महावितरणची हानी झाली आहे. उल्लेखणीय म्हणजे औंढा उपविभागात एकही फीडर जी गटात आले नाही. दुसरीकडे हिंगोली उपविभागीत जी २ मध्ये १, सेनगाव उपविभागात जी-१ मध्ये १ फीडर घसरले. आता जी १ आणि २ मध्ये अनुक्रमे ५ तर जी ३ मध्ये २ फीडर पोहचले आहेत. म्हणून जी गटाच्या क्रमानुसार ७, ८ आणि ९ तासाचे भारनियमन ग्राहकांना सोसावे लागते. विज गळती तातडीने थांबवून कडक वसुली केली तर हा आलेख वाढण्यास वाव आहे. अन्यथा आणखीच हाल होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी) वीजगळती वाढल्यामुळे दुरूस्ती करून नवीन साहित्य टाकणीचे कामे हाती घेण्यात आले आहे. वसुलीच्या महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे महावितरणला मोठे नुकसान सोसावे लागले. शिवाय वसुलीच्या कर्मचार्यांना दुरूस्तीच्या कामाकडे वेळ द्यावा लागला. परिणामी फिडरचा आलेख घरसला असून त्याच्या उभारणीसाठी योजना आखून काम केले जात आहे. -एम.एन. सिरसे, प्रभारी कार्यकारी अभियंता, हिंगोली.
१० तासांपर्यंत भारनियमन वाढले
By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST