कळंब : चोरी केलेली पाण्याची लहान मोटार दुरुस्त करायला आलेला मुद्देमालासह सापडल्याचा प्रकार ईटकूर येथे सोमवारी घडला. सदर चोरट्यास जमावाने चांगलाच चोप देवून रात्री उशीरा कळंब पोलिसांच्या हवाली केले. दरम्यान, त्या तरुणाचा घरफोडीच्या प्रकरणात हात असल्याचे पोलिसांनी सांगितले.ईटकूर येथील अमर भिमराव आडसूळ यांची घरातील पाण्याची घरगुती वापराची मोटार चोरीस गेली हाती. बाब किरकोळ तीन एक हजाराच्या रक्कमेच्या वस्तूची असल्याने त्यानीा त्यावेळेसच हा विषय सोडून दिला. परंतु अलीकडे घडलेल्या चोरीच्या घटनेने ग्रामस्थांत भितीचे वातावरण निर्माण झाल्याने अनेक गोष्टीकडे संशयाने पाहण्यास ग्रामस्थांनी सुरु केले आहे. याचा प्रत्यय सोमवारी आला. गावातील दत्तात्रय आत्माराम काळे (वय २५ रा. ईटकूर) हा तरुण ग्रामसचिवालयातील व्यापारी गाळ्यात मोटार दुरुस्तीला घेवून आला. या मोटारीला रंग देण्यात आला असल्याने योगायोगाने शेजारीच दुकान असलेल्या अमर आडसूळ यांना आपली चोरी गेलेली मोटार हीच असल्याचे लक्षात आले. यानंतर कंपनी, सिरीयल नंबर याची खरेदी बिलावरुन खात्री केली असता, ती गायब झालेली मोटार आपलीच असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, यासंदर्भात दत्तात्रय काळे याला मोटारीबाबत विचारण्यास सुरूवात केली असता, त्याने पळ काढण्यास सुरुवात केली. परंतु ग्रामस्थांनी त्याला पकडले. गावात चोरीच्या घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आधीच सतर्क असलेल्या ग्रामस्थात ही खबर पोहचली. ग्रामपंचायतसमोर मोठ्या प्रमाणात जमाव जमला. जवळपास पाचशे लोकांचा हा जमाव संतप्त झाला होता. या जमावाने दत्तात्रय काळे यास चोप देण्यास सुरुवात केल्यावर त्याने ही मोटार आपण चोरली असल्याचे सांगितले. शिवाय इतरही काही चोऱ्यात सहभाग असल्याची कबुली देवून काही सहकार्यांची नावे जमावास सांगितली. यानंतर जमावाने त्यास ग्रामपंचायतीमध्ये कोंडले व पोलिसांना कळविण्यात आले. दरम्यान, रविवारी घडलेल्या घरफोडीतही हात असल्याच्या कारणावरुन दत्ता आत्माराम काळे याच्याविरुद्ध कळंब ठाण्यात गुन्हा नोंदवून अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले. (वार्ताहर)संतप्त जमावाने पोलिसांप्रती तीव्र भावना व्यक्त करुन आरोपीस उर्र्वरित नावे व व्यक्ती निष्पन्न होत नाहीत, तोपर्यंत आरोपीस येथेच राहु द्यावे, अशी भूमिका घेतली. यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. परंतु, जमावाचा रोख पाहून पोलिस उपनिरीक्षक ए. सिद्धीकी यांनी आरोपीस तात्काळ कळंबला हलविले. तामलवाडी : कुलूपबंद असलेल्या घराच्या कुलूपाची चावी शेजारच्या शेळीपालन गोठ्यातून घेवून अज्ञात चोरट्यांनी कुलूप उघडून घरातील २८ हजार रुपयाचे सोने लंपास केले. ही घटना तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथे सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास घडली. केमवाडी-वडाळा रस्त्यावरील रामराव काशीद यांचे घर आहे. ते मुलाला घेवून तुळजापूरला गेले होते. तर पत्नी कुलूप लावून चावी शेजारच्याच शेळीपालनाच्या गोठ्यात पत्र्याच्या धोंड्याखाली ठेवून शेताकडे गेल्या होत्या. लक्ष ठेवून असलेल्या अज्ञात चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत दुपारच्या सुमारास घराचे कुलूप उघडून आत प्रवेश करत २८ हजाराचे सोने लंपास केले. याप्रकरणी रामराव शामराव काशीद (रा. केमवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेचा अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक सुरेश शिंदे हे करीत आहेत.
चोरट्याला पकडून ग्रामस्थांनी दिला चोप
By admin | Updated: November 26, 2014 01:08 IST