औरंगाबाद : चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना एक निनावी फोन आला. फोन करणाऱ्याने विमानतळावर बॉम्ब ठेवल्याची माहिती दिली आणि फोन बंद केला. घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ ‘सीआयएसएफ’चे जवान, बॉम्बशोध- नाशक पथक विमानतळाची कसून तपासणी करतात. अखेर एका पिशवीत बॉम्ब मिळतो. पथकाकडून हा बॉम्ब नष्ट करताच प्रत्येकाने सुटकेचा नि:श्वास टाकला.‘मॉक ड्रिल’च्या निमित्ताने विमानतळावर मंगळवारी अनेकांनी हा प्रसंग अनुभवला. विमानतळावर एखादा बॉम्ब ठेवण्याचा प्रसंग उद््भवल्यास वेळीच त्यावर नियंत्रण मिळवून कमीत कमी हानी टाळण्याच्या दृष्टीने यंत्रणा कितपत सक्षम आहे आणि त्यासाठी कोणत्या अडचणी येतात हे जाणून घेण्यासाठी हे मॉक ड्रिल घेण्यात आले. सकाळी ११ वाजता विमानतळाच्या अधिकाऱ्यांना एका फोनद्वारे बॉम्ब असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर सर्व सुरक्षा यंत्रणांना सतर्क केले गेले. विमानतळावर उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. अवघ्या काही वेळेत अग्निशमन विभाग, रुग्णवाहिका, डॉक्टर्स, सीआयएसएफ , बॉम्बशोधक- नाशक पथक, पोलीस विभाग आणि विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी आसा फौजफाटा विमानतळावर दाखल झाला. श्वान पथकाने विमानतळाची तपासणी केल्यानंतर एका पिशवीत बॉम्ब असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर बॉम्बशोधक- नाशक पथकाने ही पिशवी सुरक्षितरीत्या विमानताळाच्या इमारतीमधून बाहेर काढली आणि नष्ट केली. त्यानंतर उपस्थित सर्वांनी सुटकेचा नि:वास सोडला. बॉम्बचा स्फोट झाल्यावर जखमींना तात्काळ उपचारासाठी दाखल करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, यासंदर्भातही मॉक ड्रिल घेण्यात आला. मॉक ड्रिलमध्ये काही चुका आणि कमतरता आढळून आल्या आहेत. या चुका टाळून विमानतळ अधिकाधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने प्रयत्न के ला जाणार आहे.कर्मचाऱ्यांना मार्गदर्शनमॉक ड्रिलनंतर विमानतळावर बॉम्ब असल्यासारखी परिस्थिती उद््भवल्यावर कोणती काळजी घ्यावी, काय करावे यासंदर्भात अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याप्रसंगी विमानतळाचे निदेशक आलोक वार्ष्णेय, ‘सीआयएसएफ’चे असिस्टंट कमांडंट किशोरकुमार, पोलीस निरीक्षक परोपकारी, विमानतळाचे अधिकारी रामकुमार, मोहिनी शंकर, एअर इंडियाचे स्टेशन मॅनेजर रमेश नंदे आदींची उपस्थिती होती.
चिकलठाणा विमानतळावर ‘ट्रायल बॉम्ब’
By admin | Updated: December 30, 2015 00:44 IST