श्यामकुमार पुरे
छत्रपती संभाजीनगर नगर :छत्रपती संभाजीनगर-जळगाव या मार्गासाठी तब्बल १,५५० कोटी रुपये केंद्र सरकारने २०१३ मध्ये मंजूर करूनही अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही. खराब रस्त्यामुळे अनेक पर्यटक अजिंठा लेणी न पाहताच परतत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे अर्धवट कामांमुळे २०२४-२५ या वर्षात या रस्त्यावर ४० जणांचा अपघातांमध्ये बळी गेला आहे.
छत्रपती संभाजीनगर-जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७६२ मराठवाडा, खान्देश या दोन प्रमुख विभागांना जोडतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांना जाण्यासाठी हा महत्त्वाचा मार्ग असून, देश-विदेशातील पर्यटक येथे येतात.
कुठले काम अद्याप बाकी: भवनजवळील पूर्णा नदी, पालोद येथील पूल, अजिंठा येथील वाघूर नदीजवळील काम अजूनही बंद आहे. याशिवाय ठिकठिकाणी असलेल्या पुलाजवळ पॅचअप बाकी आहे. त्यावरून वाहने धडाधड आदळतात. त्यावर भराव टाकण्याची तसदी कंत्राटदाराने घेतलेली नाही.
लक्ष दिले जात नाही
केंद्र सरकारने या रस्त्याच्या कामासाठी २०१३ मध्ये १,५५० कोटी रुपये मंजूर केले होते. २५ डिसेंबर २०१५ रोजी या कामाचे केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. त्यानंतर या रस्त्याचे काम वेगाने होणे अपेक्षित असताना महामार्ग प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नाही.
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दरवर्षी हजारो देशी-विदेशी पर्यटक वेरीळ, बीबीका मकबरा ही प्रसिद्ध ठिकाणे पाहण्यासाठी येतात. वेरूळला जाणारा परदेशी पर्यटक अजिंठाची जागतिक वारसा असलेली लेणी पाहण्यासाठी जाणे अपेक्षित आहे. रस्ता खराब असल्याने निम्म्या पर्यटकांनी इच्छा असूनही लेणी पाहिली नाही.
१,५५० कोटी रुपये केंद्र सरकारने २०१३ मध्ये मंजूर केले. १२ वर्षे उलटली तरी अद्याप हे काम पूर्णत्वास गेलेले नाही.
२०२४ मध्ये वेरूळ लेणीला २३,००० पर्यटकांनी भेट दिली. त्यातील केवळ १२,००० पर्यटकच अजिंठ्याला गेले होते.