परभणी : टोमॅटोची आवक वाढल्याने जिल्ह्यातील उत्पादक अडचणीत सापडले आहेत. टोमॅटोचा भाव मोठ्या प्रमाणात घसरला आहे. परभणी शहर व परिसरात अनेक शेतकरी टोमॅटोचे उत्पादन घेतात. तीन महिन्याचे हे पीक असते. मार्च महिन्यात झालेली गारपीट, अवकाळी पाउस यामुळे टोमॅटोचे उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. परिसरातील शेतकरी उत्पादित केलेला हा माल शहरातील बीटावर विक्री करतात. कॅरेटने हा माल विक्री केला जातो. परंतु मागील काही दिवसांपासून टोमॅटोच्या भावात मोठी घसरण झाली आहे. २५ किलोचा एक कॅरेट असतो. या एका कॅरेट टोमॅटोला केवळ ४० रुपयांचा भाव मिळत आहे. ज्या टोमॅटोला ५०० रुपये प्रति कॅटेर भाव मिळायला पाहिजे तेथे ४० रुपये कॅरेट एवढा कमी भाव मिळत आहे. यातून टोमॅटो उत्पादकांचा लागवडीचा खर्च निघणेही मुश्किल झाले आहे. टोमॅटो जास्त दिवस टिकत नसल्याने उरलेला माल फेकून देण्याची वेळ उत्पादकांवर आली आहे. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक अडचणीत
By admin | Updated: May 13, 2014 01:02 IST