छत्रपती संभाजीनगर : मुंबईनंतर पुण्याची औद्योगिक वाढ संपलेली आहे. आता येणारा काळ हा छत्रपती संभाजीनगरचाच असणार आहे. त्यासाठी शहरातील नागरिक, लोकप्रतिनिधी, प्रशासन आणि शहर पोलिसांनी उद्याेगस्नेही वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. मोठ्या गुंतवणुकीसाठी उद्योजक शहरात येतात, तेव्हा वातावरण आणि सुरक्षेचा विचार बारकाईने करतात. त्याशिवाय सध्या अस्तित्वात असलेल्या आयुक्तालयाच्या हद्दवाढीसह नव्याने दोन पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्याची गरज आहे. त्यासह शहरात नव्याने दाखल झालेल्या पोलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी सांगितले.
पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी ‘लोकमत’ कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी त्यांनी ‘लोकमत’च्या कॉफी टेबल उपक्रमात संपादकीय मंडळासोबत संवाद साधला. संवादाच्या सुरुवातीला ‘लोकमत’ समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा यांनी पोलिस आयुक्तांचा शाल, मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. या वेळी ‘लोकमत’चे संपादकीय संचालक करण दर्डा यांची विशेष उपस्थिती होती.
पोलिस आयुक्त म्हणाले, छत्रपती संभाजीनगर शहरातील ही सेकंड इनिंग आहे. यापूर्वी २००३ ते २००५ या कालावधीत ग्रामीणचे अतिरिक्त पोलिस अधीक्षक पदावर काम केले. मात्र, तेव्हा निवासाचे क्षेत्र शहरातील असले तरी काम ग्रामीण भागात होते. शहर आणि ग्रामीण भागातील पोलिसिंगमध्ये मोठा फरक आहे. २३ वर्षांपूर्वीचे शहर पूर्णपणे बदलले आहे. त्यावेळी राज्यभर गाजलेले भराडी खून प्रकरण उत्तमपणे हाताळल्याचा अनुभवही त्यांनी सांगितला. शहरात पुन्हा येत पोलिस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका निर्विघ्नपणे पार पडल्या. दोन्ही निवडणुकीत ध्रुवीकरण, आयडियालॉजीसह इतर मुद्दे चर्चेला आले होते. मात्र, दोन्ही निवडणुका कोणत्याही वादाविना पार पडल्याचेही पवार यांनी सांगितले.
महापालिका निवडणुका संवेदनशीलमहापालिकेच्या निवडणुकांच्या दृष्टीने तयारी सुरू झाली आहे. या निवडणुका संवेदनशील ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकासह निवडणुकीसाठी इच्छुकांवर आपल्या शहराची प्रतिमा जपण्याची जबाबदारी असणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊनच शहराच्या विकासाला हातभार लावला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
दोन पोलिस ठाण्यांची गरजशहर औद्योगिकदृष्ट्या वेगाने विस्तारत आहे. सध्या आयुक्तालयात १७ पोलिस ठाणी आणि एक सायबर ठाणे अस्तित्वात आहे. अधिकारी आणि कर्मचारी मिळून साडेपाच हजार मनुष्यबळ आहे. मोठ्या प्रमाणात नव्याने उद्योग उभारण्यात येत असलेला भाग पोलिस आयुक्तालयाला जोडण्याची गरज आहे. शेंद्रा परिसरासह चिकलठाणा पोलिस ठाणे शहराला जोडण्याची गरज आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमध्ये रांजणगाव पोलिस ठाण्याची गरज आहे. तसा प्रस्ताव शासनाला पाठवला असून पाठपुरावा सुरु आहे.
पुन्हा अतिक्रमण होऊ नयेजालना रोडवरील अतिक्रमणामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते. आता पोलिसांसह महापालिकेच्या प्रयत्नामुळे अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात येत आहे. अतिक्रमणे हटविण्यात येत असतानाच ती पुन्हा होऊ नयेत, या दृष्टीने नियोजन करावे लागणार आहे. आपण आता अतिक्रमणे काढणार असू आणि काही दिवसांतच पुन्हा अतिक्रमणे झाली तर केलेली मेहनत वाया जाते.
पोलिसांच्या घरांसाठी प्राधान्यशहरात पाेलिस कर्मचाऱ्यांच्या निवासाचा प्रश्न सुटलेला नाही. प्रत्येक पोलिस कर्मचाऱ्यास घर देता येत नाही. क्रांतीचौक परिसरात पोलिसांच्या घराचा प्रकल्प उभारण्याचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. तो सोडविण्याचा प्रयत्न करीत आहे. या प्रकल्पासाठी ८५ कोटी रुपयांच्या निधीला मान्यता मिळालेली आहे. काही दिवसांपूर्वी शहर पोलिसात नव्याने २०४ कर्मचारी दाखल झाले आहेत. या युवकांना घरे देता येत नसल्याची खंतही पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी व्यक्त केली.
आरोपींच्या अटकेसाठी अर्जाचा नमुना तयारमुकुंदवाडी परिसरातील खुनाच्या घटनेत आरोपींना तांत्रिक मुद्याच्या आधारावर न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आल्याची घटना घडली. त्यानंतर आयुक्तालयाच्या हद्दीत कार्यरत सर्वच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्या बैठकीत आरोपीच्या अटकेवेळी नव्या नियमानुसार काय खबरदारी घ्यायची याविषयीची सूचना देण्यात आल्या. त्याचवेळी अटकेवळी कोणत्या गोष्टींची पूर्तता केली पाहिजे याचा एक नमुना तयार करण्यात आला आहे. प्रत्येक अटकेच्या वेळी या नमुन्याप्रमाणे अटक झाली किंवा नाही याची खात्री करूनच पुढील कारवाई केली जाईल. त्यामुळे यापुढे तांत्रिक चुकाही टाळल्या जातील असेही त्यांनी सांगितले. न्यायालयाच्या निर्णयाच्या आधीन राहून काम करण्याच्या दृष्टीने पोलिसांच्या प्रशिक्षणावर भर दिला जाईल, असेही ते म्हणाले.