छत्रपती संभाजीनगर : जालन्याहून लोखंडी सळ्या घेऊन पुण्याच्या दिशेने निघालेला सुसाट ट्रक दुभाजकावर जाऊन आदळला. यात चालक आकाश अशोक राठोड (वय २८) हा सुखरूप बचावला. मात्र त्याचा सहकारी लक्ष्मण बाळासाहेब धोत्रे (४३, दोघे रा. वाघेश्वरनगर, वाघोली) याचा पोटात सळ्या घुसून आतडे बाहेर आल्याने घटनास्थळीच मृत्यू झाला. बुधवारी मध्यरात्री दोन वाजता बीड बायपासवर एमआयटी पूल उतरल्यानंतर राज्य वखार महामंडळासमोर हा अपघात घडला.
एकाच वसाहतीत राहणारे आकाश व लक्ष्मण सोबतच ट्रान्स्पोर्टचे काम करत होते. कंपनीच्या ऑर्डरनुसार ते बुधवारी जालन्याला लोखंडी सळ्या घेण्यासाठी गेले होते. रात्री सळ्या घेऊन त्यांनी झाल्टामार्गे शहरात प्रवेश केला. बीड बायपासमार्गे त्यांना पुण्याच्या दिशेने रवाना व्हायचे होते. एमआयटी महाविद्यालयासमोरील पूल उतरताना मात्र त्यांना समोरील दुभाजकाचा अंदाजच आला नाही. ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात सळ्या असल्याने व ७० ते ८० कि.मी. ताशी वेग असतानाही ट्रक पुलावरून वेगात उतरला. तो थेट दुभाजकावर जाऊन आदळला. यात मागील सर्व सळ्या समोर केबिनमध्ये घुसून केबिन जवळपास १५ ते २० फुटांपर्यंत फेकली गेली.
पोटात सळ्या घुसल्याकेबिन दूरवर फेकली जाताच धोत्रे यांच्या पोटात सळ्या घुसून आतडेच बाहेर आले. दोन्ही पाय तुटल्याने ते घटनास्थळीच मरण पावले; तर आकाश आश्चर्यकारकरीत्या बचावला. या घटनेमुळे परिसरात मोठा स्फोटासारखा आवाज झाला. घटनेची माहिती मिळताच सहायक फौजदार पृथ्वीराज चव्हाण, विष्णू जगदाळे यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मार्गावर ब्लिंकिंग लाइटचा अभावबीड बायपासवरील पुलावर दुभाजक नसल्याने दोन्ही दिशांची वाहने धोकादायकरीत्या ओव्हरटेक करतात. शिवाय, रस्त्यावरील वळण, महत्त्वाचे चौक, पुलावर दुभाजक दर्शवणारे रेडियम, ब्लिंकिंग लाइट बसवण्यात आलेले नाहीत. परिणामी, चालकांना अंदाजच येत नाही. या कारणांमुळे ११ महिन्यांत पाच अपघाती मृत्यूच्या घटना घडल्याचे सातारा पोलिसांनी सांगितले.