उस्मानाबाद : दुष्काळी उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा आधार ठरलेला तुळजाभवानी जिल्हा सहकारी दुध संघ गुंडाळण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. यासाठी जिल्हा विशेष लेखा परीक्षक किसन सागर यांची अवसायक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत जिल्ह्यातील दुग्धोत्पादक शेतकऱ्यांसाठी हा मोठा धक्का असून, नियोजनाचा बोजवारा उडाल्याने संघ गुंडाळण्याची नामुष्की ओढवली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील शेती कायम बेभरोसी राहिली आहे. पावसाचे अत्यल्प प्रमाण आणि त्यातच अत्यंत कमी सिंचन क्षेत्र यामुळे शेतकऱ्यांना शेतीतून अपेक्षित उत्पादन मिळत नाही. यावर मात करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दुग्धोत्पादनाकडे आपला मोर्चा वळविला होता. या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्याला मोठा आधार मिळू लागला. पर्यायाने काही वर्षापूर्वी दुध संघाची व्याप्तीही वाढली होती. विशेषत: उस्मानाबाद, तुळजापूर तालुक्यासह भूम, परंडा, वाशी या तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी दुध उत्पादनाकडे आकृष्ट झाले होते. मात्र ढिसाळ कारभारामुळे संघ अवसायनात काढण्याची वेळ ओढावली आहे. मागील वर्षीच्या उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात १ हजार ५२४ दुग्धविकास सहकारी संस्थांची नोंद असून, या संस्थामध्ये ७७ हजार ५२० हून अधिक सभासद आहेत. २०१३ मध्ये या संस्थांच्या माध्यमातून १ कोटी ६३ लाख १ हजार लिटर दुधाचे संकलन झाले होते. म्हणजेच दुध संकलन करण्याची मोठी क्षमता असतानाही तसेच या व्यवसायाची व्याप्ती अधिक वाढविण्याच्या संधी असतानाही जिल्हा दुध संघ तोट्यात जातोच कसा? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. उपलब्ध माहितीनुसार २०१३ मध्ये दुग्ध विकास सहकारी संस्थांच्या माध्यमातून परंडा तालुक्यात १७,४९००० लिटर दुध संकलन झाले होते. भूम तालुक्यात ८०,६२००० लिटर, वाशी तालुक्यात ५११०००, कळंब २४७४०००, उस्मानाबाद १६६७०००, तुळजापूर ३४७०००, लोहारा ४०४००० तर उमरगा तालुक्यात १०८७००० लिटर दुधाचे संकलन झाले होते. एकंदरीत जिल्ह्यातील दुग्ध संकलन पाहता हा संघ टिकण्याची आवश्यकता होती. मात्र मागील काही वर्षांपासून दुध संघाला घरघर लागली होती. अखेर प्रशासनाने हा संघ गुंडाळण्याचा निर्णय घेतला असून, जिल्हा विशेष लेखा परिक्षक सागर यांची अवसायक म्हणून नियुक्ती केली आहे. अवसायकपदी नियुक्ती झाल्यानंतर संघाचा हिशोब सुरु करण्यात आला आहे. ज्यांचे संघाकडे येणे आहे त्यांनी त्यांचा हिशोब पुराव्यासह दाखल करुन रक्कमेची मागणी करावी. तसेच देणे असलेल्या रक्कमेचा व्याजासह तात्काळ भरणा करावा, असे आदेश किसन सागर यांनी दिले आहेत. संघाचे येणे असलेल्या रक्कमा अदा न झाल्यास संस्थेच्या दप्तरामध्ये नमूद केलेल्या रक्कमा वसूल करण्यासाठी कायद्यानुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे.
दूध संघावर अखेर अवसायक नियुक्त
By admin | Updated: July 30, 2015 00:44 IST