कळमनुरी : तालुक्यात खरीप हंगामामध्ये सोयाबीनचे पेरणीक्षेत्र १० टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे. शिवाय बियाणांची टंचाई भासणार असल्याने शेतकर्यांनी घरगुती बियाणेच उगवणक्षमता तपासून पेरण्याचा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आला आहे. सोयाबीनला पेरणी व लागवड खर्च कमी, हमीभाव असल्याने यावर्षी सोयाबीन वाढण्याची शक्यता आहे. तर कापसाचे पेरणीक्षेत्र १० टक्के कमी होण्याची शक्यता आहे. लागवडीला खर्च जास्त, फवारणी, खते आदींना खर्च जास्त व हमीभाव कमी, मजुरांची कमतरता, लागवड ते वेचणीपर्यंत जास्त खर्च येत असल्याने यावर्षी हा पेरा १० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता आहे. कमी जमीन असलेल्या शेतकर्यांकडे बैलजोडी नसल्याने व बैलजोडीची किंमत लाखांच्या जवळपास पोहोचल्याने त्यांना बैलजोडी ठेवणे परवडत नसल्याने कापसापेक्षा सोयाबीन पेरणीकडेच शेतकर्यांचा कल दिसत आहे. तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे. या पैकी ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २५ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होण्याची शक्यता आहे, अशी माहिती तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी दिली. गावोगावी शेतकर्यांना पेरणीपूर्व मार्गदर्शन कृषी खात्यामार्फत करण्यात आले आहे. बियाण्यांची उगवणशक्ती तपासून बियाणे पेरावे, बियाण्यांची बीज प्रक्रियाही करणे गरजेचे असल्याचे कृषी अधिकार्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले. बाजारातून कोणतेही बियाणे आणले तरी त्याची उगवणशक्ती तपासूनच पेरण्याचे आवाहनही कृषी खात्याच्या वतीने करण्यात आले आहे. सोयाबीनची उपलब्धता असलेल्या शेतकर्यांच्या याद्या कृषी सहाय्यकांनी तयार केल्या आहेत. इतर शेतकर्यांना हे बियाणे कामी पडणार आहे. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा जाणवणार आहे. शेतकर्यांकडे उपलब्ध असलेले सोयाबीनच इतर शेतकर्यांना बियाणे म्हणून कामी पडणार आहे. सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्के असली तरी हे बियाणे पेरण्यास कमी पडणार आहे. गावोगावी शेतकरी मेळावे घेवून मंडळ कृषी अधिकारी टोंपे, राठोड, वाईकर, खुपसे, गिरी, आर.एस. भिसे, पोहनकर आदींनी मार्गदर्शन केले. तूर, ज्वारी, बाजरी, मुग, उडीद आदी पिकांचा पेरा मागच्या वर्षीइतकाच राहणार आहे. सध्या शेतकरी खरीप हंगामपूर्व मशागतीच्या कामात गुंतले आहेत. बियाणांची उगवणशक्ती तपासूनच पेरणी करा येत्या खरीप हंगामात शेतकर्यांनी कोणत्याही बियाण्यांची उगवणशक्ती तपासून व बीजप्रक्रिया करूनच पेरणी करावी. यावर्षी सोयाबीनच्या बियाण्यांचा तुटवडा भासण्याची शक्यता आहे. शेतकर्यांनी सोयाबीनला चांगला हमीभाव असला तरी बाजारात ते न विकता इतर शेतकर्यांना द्यावे. बियाणे पेरणीबाबत काही अडचण आल्यास तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी डी.बी. काळे यांनी केले आहे. (वार्ताहर) कळमनुरी तालुक्यात खरिपाचे सर्वसाधारण पेरणीक्षेत्र ७७ हजार हेक्टर आहे. या पैकी ३७ हजार हेक्टरवर सोयाबीन तर २५ हजार हेक्टरवर कापसाची पेरणी होण्याची शक्यता आहे. शेतकर्यांनी कोणत्याही बियाण्यांची उगवणशक्ती तपासून व बीज प्रक्रिया करूनच पेरणी करण्याचे अधिकार्यांचे आवाहन
सोयाबीनच्या पेरणी क्षेत्रात १० टक्के वाढ होणार
By admin | Updated: May 27, 2014 00:48 IST