श्रीक्षेत्र माहूर : माहूर तालुक्यातील मौजे चोरड येथे दूषित पाणी व डेंग्यू डास चावल्याने दोन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच याच गावात शेतात उगवलेले करळ खावून पालाईगुडा तलावातील दूषित पाणी पिल्याने सात गायी मृत्यूमुखी पडल्या. ३५ जनावरांवर अत्यवस्थ अवस्थेत उपचार सुरू असल्याची घटना १५ मे रोजी घडली आहे. १५ रोजी गावातील जनावरे दिवसभर चरुन गावात तलावाचे पाणी पिवून आली. गावातील रामधन आमरु राठोड यांची गाय, मदन आमरु राठोड, विठ्ठल शोभा पवार यांची गाय तर नरेंद्र हरी राठोड यांच्या गायीसह इतर तीन जनावरे पाय खोरु लागल्याने त्यांनी तत्काळ पशुवैद्यकीय अधिकारी रवींद्र राजगुरु यांना दूरध्वनी वरुन घटना कळविली. राजगुरु गावात पोहोचेपर्यंत सात जनावरे मरण पावली. अन्य जनावरेही गावात येता येता वाटेतच पडून पाय खोरु लागली व गावात आलेली जनावरेही अशीच करु लागल्याने पूर्ण गावात घबराट पसरली. खासगी पशुचिकित्सक राम राठोड व अब्दुल वहीद यांचीही उपचारासाठी मदत घेण्यात आली व येथील सरपंच अरविंद राठोड यांनीही तत्काळ गावकर्यांच्या मदतीने माहूर व सारखणी येथून १० हजार रुपयांची औषध गोळ्या मागवून औषधोपचार सुरू केल्याने परिस्थिती नियंत्रणात आणली. घटना कळताच गटविकास अधिकारी व्ही.आर. पाटील, तालुका आरोग्य अधिकारी एस.बी. भिसे यांनी माहूर तालुक्याच्या दौर्यावर असलेले जिल्हा आरोग्य अधिकारी व्ही.आर. मेकाने यांना घेवून उशिरा रात्री चोरड गावात भेट देवून आवश्यक ते उपचार साहित्य उपलब्ध करुन दिले. मौजे चोरड गावाला लागून असलेल्या तलावातील पाणी दूषित झाल्याने तलावातील मासे अचानकपणे मरुन वर तरंगतांना दिसत आहेत. गावातील कोंबडयाही अचानकपणे मृत्यूमुखी पडत आहेत. एकूणच या वातावरणामुळे चोरड गावातील जनता भयभीत झालीं असून विशेष पथक तत्काळ पाठवून येथील आरोग्य व्यवस्था व्यवस्थित करावी, अशी मागणी येथील होत आहे. (वार्ताहर)
दूषित करळ खाल्ल्याने सात जनावरांचा मृत्यू, ३५ अत्यवस्थ!
By admin | Updated: May 18, 2014 01:25 IST