ग्रामीण रूग्णालय समस्यांनी ग्रासलेले
By Admin | Updated: July 26, 2015 00:01 IST2015-07-25T23:57:49+5:302015-07-26T00:01:07+5:30
देवगडवासीयांची व्यथा : आरोग्यमंत्र्यांच्या तालुक्यातच यंत्रणा कोलमडलेली

ग्रामीण रूग्णालय समस्यांनी ग्रासलेले
अयोध्याप्रसाद गावकर ल्ल देवगड
तालुक्यातील ग्रामीण रूग्णालयासह सहाही प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर गंभीर परिणाम झाला असून चर्चेत असलेले ग्रामीण रूग्णालय विविध समस्यांनी ग्रासले आहे. गेले एकवर्ष ग्रामीण रूग्णालयामध्ये भूलतज्ज्ञ उपलब्ध नसल्यामुळे अवघड होणाऱ्या प्रसुतीसेवेवर व इतर करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रियेवर गंभीर परिणाम झाला आहे. ग्रामीण रूग्णालयातील रिक्त वैद्यकीय अधिकारी पदे, सोनोग्राफी, एक्स-रे तज्ज्ञ, रूग्णालय इमारतीची दुरवस्था, शासकीय निवासस्थानांची दुरवस्था, रक्तपेढीची गळकी इमारत या प्रश्नांची दखल घेणे महत्वाचे आहे. आरोग्य मंत्र्यांच्याच तालुक्यामध्ये आरोग्य यंत्रणा कोलमडली आहे.
देवगड ग्रामीण रूग्णालयाला उपजिल्हा रूग्णालयाचा दर्जा मिळाला आहे. मात्र, सुविधा या ग्रामीण रूग्णालयाच्याच आहेत. तर पडेल, मोंड, फणसगांव, इळये, मिठबांव, शिरगांव या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद आहे. या अंतर्गत ३८ उपप्राथमिक आरोग्य केंद्रे तालुक्यामध्ये आहेत. देवगड ग्रामीण रूग्णालयामध्ये डॉक्टरांच्या रिक्त पदांमुळे रूग्णसेवेवर गंभीर परिणाम होत असून डॉक्टरांची रिक्त पदे भरणे गरजेचे आहे. दरदिवशी २२५ रूग्णांची ओपीडी या रूग्णालयात होते. तालुक्यातील गोरगरीबांचे देवदूत असणारे हे रूग्णालय आहे. डॉक्टरांच्या रिक्त पदांचा प्रश्न रूग्णालयाला भेडसावत आहे.
मे २०१४ पासून ग्रामीण रूग्णालयात भूलतज्ज्ञ येत नसल्यामुळे अवघड व गुंतागुंतीच्या प्रसुती करता येत नसल्याने अशा महिलांना शस्त्रक्रियेद्वारे करण्यात येणाऱ्या प्रसुतीसाठी बाहेर पाठवावे लागत आहे. देवगड ग्रामीण रूग्णालयात मे महिन्यापासून भूलतज्ज्ञ येत नसल्यामुळे ६० पेक्षा अधिक अवघड प्रसुती होणाऱ्या महिलांना बाहेर पाठवावे लागले ही बाब गंभीर आहे. देवगड रूग्णालयात मे महिन्यापासून आतापर्यंत १३८ सामान्य प्रसुती झाल्या तर ६२ अवघड प्रसुती होणाऱ्या महिलांना बाहेर पाठवावे लागले.
भूलतज्ज्ञ येत नाही हा गंभीर विषय
सध्या देवगड ग्रामीण रूग्णालयात भूलतज्ज्ञ येत नाही हा गंभीर विषय आहे. मानधन वाढवून द्यावे अशी भूलतज्ज्ञांची मागणी होती. देवगड तालुका दुर्गम असल्याने वैद्यकीय अधिक्षकांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे भूलतज्ज्ञांचे मानधन वाढवून द्यावे अशी पत्राद्वारे मागणी केल्याचे डॉ. भिसे यांनी सांगितले. त्यानुसार जिल्हा शल्यचिकित्सकांनी मानधन वाढवून देण्याचे पत्र दिले तरीही भूलतज्ज्ञानी रूग्णालयाकडे पाठ फिरविली. मानधन वाढवूनही भूलतज्ज्ञ येत नाही ही बाब दुर्दैवी आहे. खासगी भूलतज्ज्ञ मानधन वाढवून देखिल येण्यास तयार नसेल तर रूग्णालयात शासनामार्फत कायमस्वरूपी भूलतज्ज्ञ मिळावा यासाठी राजकीय मंडळींनी प्रयत्न करावेत. कणकवली-देवगड मतदारसंघाचे आमदार नीतेश राणे यांनी या विषयात लक्ष घालून लोकांना न्याय मिळवून देण्याची मागणी होत आहे.